येरवडा – सनदशीर मार्गाने आंदोलने करुनही राज्य सरकार त्याची दखल घेत नसल्याने ज्या आमदारांच्या पाठबळावर सरकार बनते त्या आमदारांच्या कार्यालयाबाहेर अंगणवाडी ताईंनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाची पन्नाशी आमदारांच्या दाराशी, आमदार तुपाशी अंगणवाडी ताई उपाशी, अशा घोषणा देत अंगणवाडी ताईंनी आमदार सुनील टिंगरे तसेच पुण्यातील इतर आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, भरवी मानधनवाढ, कामकाजासाठी नवीन मोबाईल/टॅब, ग्रॅज्युइटी, मासिक पेन्शन आदी मागण्यांसाठी दि. ४ डिसेंबर २०२३ पासून अंगणवाडी ताईंचे काम बंद आंदोलन सुरू आहे. तेंव्हापासून आज अखेर वरील मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने विविध आंदोलने करण्यात आली. दि. २२ जानेवारीला आंदोलनास ५० दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या 50 दिवसांपासून राज्यातील वाडी-वस्ती गावपाड्यामधील गरीब घटकातील ही बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.
मात्र, याविषयी राज्य सरकार गंभीर नाही. इतर अर्थपूर्ण विषयाकडे लक्ष पुरवणाऱ्या सरकारचे-मानवी विकासाशी संबंधित प्रश्न सोडवण्याला प्राधान्य नाही. म्हणून या आंदोलन व मागण्यांकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी एकाचवेळी आमदारांच्या कार्यालयासमोर अंगणवाडी ताईंचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस घोषणा देत आंदोलन केले.