नागपूर – सत्यपाल मलिक यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे नसून, हे सत्य आहे. पुलवामा हल्ला पूर्वनियोजित होता. त्या 40 जवानांची राजकीय स्वार्थापोटी हत्या झाली, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यावरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी थेट मोदी सरकारच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली आहे. मोदी सरकारवरच राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी करत निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, 2019 ला लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाणारे आताचे सत्ताधारी हे निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील, असे माहिती होते. विरोधकांनी अनेकदा त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांना भाजपने देशद्रोही ठरवले.
300 किलो आरडीएक्स पुलवामामध्ये पोहोचले कसे? पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षाकर्मी प्रवास करत नाहीत. त्यांना सरकारने किंवा एअरफोर्सने विमान का दिले नाही? की त्या 40 जवानांची हत्या करून त्याचा राजनीतिक फायदा उचलण्याचा डाव होता, असा हल्लाबोल करत त्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
सर्जिकल स्ट्राइक केले होते, म्हणजे भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅराकमांडो ही कामगिरी करत असतात. खडतर प्रशिक्षण घेऊन ही कारवाई केली जाते. यामध्ये अचूक नियोजन आणि अनेक दिवस तयारी करावी लागते.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला उत्तर द्यायचे म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यानंतर भारतीय लष्कराचे संपूर्ण जगभरात कौतुक केले जात होते. ऐन 2019 च्या निवडणुकीपूर्वी ही घटना घडल्यानंतर विरोधकांनी त्यावर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले होते.