प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक : आमदार शेळके भूमिपुत्रांसाठी आग्रही
तळेगाव स्टेशन – मावळ तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांना एमआयडीसीमधील कंपन्या कामावर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. विविध कारणे देऊन स्थानिकांना जाणून-बुजून डावलले जात असल्याने बेरोजगारी वाढत आहे. भविष्यात नवीन कंपन्यांना तालुक्यात जागा उपलब्ध करून देत असताना राज्याच्या रोजगार धोरणानुसार स्थानिकांना प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केली.
एमआयडीसी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार शेळके यांनी राज्याच्या उद्योग व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची मंत्रालय येथे भेट घेऊन चर्चा केली. या वेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी मंत्री तटकरे यांच्याकडे मावळ तालुक्यातील एमआयडीसी संदर्भातील विविध प्रश्न आणि मागण्या मांडल्या. तळेगाव, नवलाख उंब्रे एमआयडीसीतील वाढती वाहतूक पाहता या एमआयडीसी परिसरात ट्रक टर्मिनल उभारणे गरजेचे आहे.
…तरच स्थानिकांचे जीवनमान उंचावेल
भविष्यकाळात मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल व स्थानिक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल, ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
स्थानिकांना हवे रोजगाराभिमुख प्रशिक्षण
तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र वाढत असताना कुशल कामगार स्थानिक युवकांमधून निर्माण व्हावेत, यासाठी कौशल्य विकासावर आधारित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांची गरज आहे. लोणावळा येथे एकच औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून, भौगोलिक परिस्थितीनुसार मध्यवर्ती ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारणे गरजेचे आहे. तरुणांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे. महाआघाडी सरकारकडून औद्योगिक क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यानुसार प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, अशा विविध प्रश्नांवर आमदार शेळके यांनी लक्ष वेधले. तसेच या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी, अशी सूचनाही आमदार शेळके यांनी केल्या.