पुणे -समृद्धी महामार्ग देशातील मोठ्या प्रोजेक्टपैकी एक मानला जातो. परंतु, या मार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे प्रोजेक्टमध्ये त्रुटी राहिल्या आहेत का? अशी शंका येऊ लागलेली असतानाच या मार्गावर होणारे अपघात हे “रोड हिप्नॉटिझम’मुळे घडत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते. त्या दिवसापासून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत या मार्गावर तब्बल 39 जणांनी अपघातात जीव गमावला आहे तर, 143 जण विविध अपघातांमध्ये जखमी झाल्याची नोंद या महामार्ग पोलिसांकडे आहे. यात अपघातांचे मुख्य कारणांचा उल्लेखही करण्यात आला आहे. यातून हे अपघात “रोड हिप्नॉटिझम’मुळे घडत असल्याचा निष्कर्षही पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे.
“रोड हिप्नोटिझम’ म्हणजे काय?
अपघातामागील या कारणाचा अर्थ “रस्ते संमोहन’ असा शब्दश: सांगता येईल. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते सतत दोन-अडीच तास वाहन चालवल्यानंतर ही स्थिती चालकामध्ये उद्भवू शकते. याचा थेट परिणाम मन विचलीत होण्यावर होतो. जेथं चालकाचे लक्ष विचलित होऊन पूर्णपणे दुसऱ्याच कोणत्याही गोष्टीवर केंद्रित होते आणि त्याचे मन आणि बुद्धीवर त्या गोष्टीची पकड आणखी घट्ट होते. परिणामी मेंदूला कोणताही सतर्क करणारा संदेश मिळत नाही. मेंदू पूर्णपणे निष्क्रीय होतो पण शारीरिक क्रिया मात्र सुरू असतात. डोळ्यांनी दिसत असताना मेंदूला मात्र वेगळेच दर्शवित असतो. दोन-अडीच तासात मेंदूची सक्रिय होण्याची शक्ती कमी झालेली असते. अशा परिस्थितीत चालक विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. अखेर 120 ते 140 कि.मी. प्रतितास वेगावर असणारी वाहने अचानक समोरासमोर किंवा पाठीमागून धडकतात. ही परिस्थिती “रोड हिप्नॉटिसिस’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे दोन किंवा त्याहून अधिक तासांचा प्रवास असल्यास मध्ये मध्ये काही काळ थांबा घेणे गरजेचे ठरते; परंतु समृद्धी महामार्गावर अशी कोणतीही सुविधा नसल्याने चालक सतत वाहन चालवितात यातून अपघात घडत आहेत.
समृद्धी महामार्गाविषयी…
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन
नागपूर – शिर्डी पहिला टप्पा
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव
701 कि.मी. सलग महामार्ग
नागपूर ते मुंबईदरम्यानचे अंतर कमी करणे मुख्य हेतू