विजय सोनवणे
खेड – पोलीस आणि नागरिकांचा योग्य समन्वय साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सर्वच उपक्रमांनी उत्कृष्ट ठरलेला “यादव पॅटर्न’ पुन्हा एकदा रुजवण्याची गरज आहे. यादव यांच्या बदलीनंतर पुन्हा तालुक्यात अवैध व्यवसाय तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
खासगी सावकारकी, दारू, गुटखा, मटका आदींसह चोऱ्या, वाहतूक कोंडी आदी महत्वाच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. म्हणावी तशी पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसल्याची खंत अनेक नागरिकांनी व्यक्त केली. अनेक गुन्ह्यांना घडण्यापूर्वीच प्रतिबिंब होणे अपेक्षित असताना पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करत नाही. खेडसह परिसरातील अनेक भागात गावठी दारू, जुगार, मटका, गुटखा आदीने उच्छाद मांडला आहे. या अवैध व्यवसायांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरत आहे.
तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या कल्पकतेतून राबविलेल्या अनेक उपक्रमांमुळे कर्जत पोलीस ठाण्याबद्दल तालुक्याच्या सर्व गावातील नागरिकांना वेगळाच आदर होता. महिला-मुलींना तर कर्जत पोलीस ठाणे म्हणजे हक्काचे माहेरघर वाटत होते. त्यामुळे कोणत्याही मुलीवर अन्याय अत्याचार झाला किंवा तसे आढळून आल्यास संबंधित त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सत्र पोलीस राबवत होते.
मुली व महिलांची छेड काढली तर थेट पोलीस निरीक्षकच जातीने लक्ष देत असल्याने अनेकांना धास्ती होती. त्यामुळे महिला मुलींना मोठा आधार वाटत होता. सध्या कर्जत पोलीस ठाण्यात अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.त्यामुळे पोलीस निरीक्षकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे की काय? अशी चर्चा नागरिक करीत आहेत.
तालुक्यातील अनेक रस्त्यांवर होणारे अपघात, वाहतूक कोंडी यावर तर कर्जत पोलिसांचा सध्या कसलाच वचक राहिला नसल्याचे दिसते. त्यामुळे चंद्रशेखर यादव यांनी राबवलेला “यादव पॅटर्न’ पुन्हा एकदा रुजवण्याची खरी गरज आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणा व्हेंटिलेटरवर!
तालुक्यातील अनेक गुन्हेगारीच्या घटनांवर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण आणणे शक्य होत होते. चोऱ्या, दरोडे, अपघात, प्रशासकीय माहिती ग्रामस्थांना क्षणात समजत असल्याने अनेक गुन्हेगारांना गजाआड करणे शक्य झाले. पोलीस निरीक्षक यादव यांच्या पुढाकारातून कार्यान्वित झालेली ही यंत्रणा नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरली. सध्या हीच यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे जाणवते.