राहुरी विद्यापीठ -महाराष्ट्रात विविध भौगोलिक विभागात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे. या नैसर्गिकपणे उपलब्ध असणाऱ्या कृषि मालाचे ब्रॅन्डींग करुन शहरातील ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी बांधवाचा आर्थिक स्तर उंचविण्यात मदत होईल. शासन बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना आणणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे सेंद्रिय शेती निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्था या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री भुसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा उपस्थित होते.
यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक विजय कोते, प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि आयोजन सचिव डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
नामदार भुसे म्हणाले, शेतकरी उत्पादन घेतो पण ते विकणे अवघड जाते. या लॉकडाऊन स्थितीमध्ये काही शेतकऱ्यांना स्वतः शेतीउत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. याच उत्पादनाला ब्रॅन्डींगची जोड दिली तर नक्कीच शेतीमालाला जास्त दर मिळतील. सेंद्रिय शेती मालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कास्ट-कासम प्रकल्पाबाबत माहिती या प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा आयोजक सचिव डॉ. उल्हास सुर्वे यांनी सादर केला. यावेळी डॉ. किरण कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर आभार संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी मानले. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी व तज्ञ कृषिरत्न विश्वासराव पाटील, अनिल देशमुख, प्रशांत नाईकवाडी, वैभव चव्हाण, रेवती जाधव, मोनिका मोहिते, विवेक माने, उत्तम धिवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रशिक्षणाला राज्यातून सुमारे 1000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या एक आठवड्याच्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत ऑनलाईन प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले. या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. सेवक ढेंगे, हेमंत जगताप, इजी. मोहसीन तांबोळी यांनी काम पाहिले.