करोना आपत्तीला चीन कारणीभूत असल्याचा अमेरिका, युरोपला संशय आहे. द्वितीय महायुद्धात जर्मनी आणि जपानविरुद्ध अमेरिका आणि इतर युरोपियन देश एकत्र आले होते तसे आता होईल का? यामुळे युद्धात्मक स्थिती निर्माण झाली तरी प्रत्यक्ष युद्ध होणार नाही. युद्धाचा प्रकार बदलू शकेल. चीनवर सैन्य आक्रमण होणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये युद्धाच्या पद्धती बदलल्या आहेत. मात्र आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक युद्ध मात्र करता येईल. तशी मानसिकता जगभर तयार होत आहे.
आता जगात युद्धाची परिभाषा बदलत चालली आहे. एखाद्या देशाची कोंडी करण्याचे इतरही पर्याय आहेत. त्यामुळे इतर प्रकारची युद्धात्मक कारवाई सुरू होऊ शकते. संपूर्ण जगाचा एकमेव शत्रू म्हणजे चीन, अशी मानसिकता आता तयार होत आहे. करोना विषाणूला चिनी विषाणूच म्हटले पाहिजे. हे चीनने जगावरती आणि भारतवरती लादलेले तिसरे जैविक महायुद्ध आहे यामध्ये कुठलाही संशय नसावा. या महायुद्धामध्ये जगाचे जेवढे नुकसान झाले तेवढे नुकसान याआधीच्या पहिल्या दोन महायुद्धामध्ये आणि जगामध्ये झालेल्या अनेक युद्धांमध्ये सुद्धा झालेले नव्हते.
चीनला संपूर्ण जगावर अंमल प्रस्थापित करायचा आहे. जागतिक महासत्ता बनण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेत अमेरिका अडसर ठरू शकते. आशिया खंडामध्ये भारत हा एकुलता देश आहे की जो चीनचा अडथळा आहे. म्हणून चीन भारताला वेगवेगळ्या प्रकारे युद्ध करून त्रास देतच राहील आणि त्याकरता आपल्याला तयार असावे लागेल. महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे वुहानमधल्या प्रयोगशाळेत अशाप्रकारच्या विषाणूच्या निर्मितीवर काम सुरू असावं आणि हा प्रयोग होत असताना काही चुकांमुळे किंवा त्रुटींमुळे हा विषाणू बाहेर पडला. हा विषाणू चीनमध्ये फार कमी पसरला. मात्र, हजारो मैल दूर अमेरिका तसेच युरोपमध्ये या विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. असे कसे झाले? हे फक्त जैविक युद्ध नाही तर संपूर्ण जगावर करोनाची दहशत पसरली आहे. त्यामुळे हे मनोवैज्ञानिक युद्धही आहे. म्हणून याला मनोवैज्ञानिक स्तरावरसुद्धा प्रत्युत्तर द्यावे लागेल. हे उत्तर कसे द्यायचे हा एक वेगळाच विषय आहे.
संकटातील बलस्थाने
चीनमुळे जगावर हे संकट ओढवले आहे. चीनला वठणीवर आणणे गरजेचे आहे. असे म्हटले जाते की अजून पंधरा वेगवेगळे विषाणू चीनने प्रयोगशाळेमध्ये तयार करून ठेवले आहे त्यांना सोडले तर जगाची काय हालत होईल? जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता कुणात आहे, या प्रश्नाच्या उत्तरात अनेक देशांची नावं पुढे येत आहेत. पण, सहमती होताना दिसत नाही आणि होईल, याची कसलीही शाश्वती नाही. अमेरिकेची महाशक्ती म्हणून असलेली ओळख करोनाने धोक्यात आणली आहे. आज जगात भारताची प्रतिमा झपाट्याने उजळत आहे. करोनाचे संकट संपुष्टात आल्यानंतर भारताने कमावलेल्या या विश्वासार्हतेचा लाभ जगाला होणार आहे. या करोना महायुद्धातील आरंभकाळात जाणवलेल्या आपल्या अनेक बलस्थानांमुळे हे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
भारताचे महत्त्व वाढेल
आज करोनाच्या प्रादुर्भावामुळे युरोप खंडातल्या बहुसंख्य देशांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. इंग्लंड, इटली, फ्रान्स, स्पेन सारख्या तथाकथित महासत्तांना करोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं आहे. इंग्लंडचे पंतप्रधानच अतिदक्षता विभागात करोनाचे रुग्ण म्हणून दाखल झाले. मात्र करोनाच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतर या देशांच्या मानसिक स्थितीत आमूलाग्र बदल झाल्याचं पाहायला मिळेल. आज त्याची थोडीशी झलक दिसू लागली आहे.
भारताला करोनावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळालं. यामुळे भारत हा उत्तम प्रशासन असणारा देश असल्याची प्रतिमा बाहेरच्या जगात तयार झाली आहे.आर्थिक, संरक्षणविषयक साहित्य निर्मिती, अनेक आघाड्यांवर भारत चीनच्या मागे आहे. पण, हे करोनापूर्वीच्या जगात. करोनानंतरच्या जगात काय होणार हे येणारा काळच सांगेल.
भारतास संधी
भारताला जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असे संकेत मिळायला प्रारंभ झाला आहे. या व्हायरसचा मुकाबला करताना जगाची जी दमछाक झाली आहे, त्यात भारताची प्रतिमा उजळून निघाली आहे. भारताकडे बघण्याचा जागतिक समुदायाचा दृष्टिकोन बदलला आहे. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनीही भारताची प्रशंसा केली आहे. जी-20 राष्ट्रसमूहानेही भारतीय प्रयत्नांची प्रशंसाच केलेली दिसते आहे. एकूणच या जागतिक संकटातही भारताने आपली प्रतिष्ठा वाढवली आहे. चीनमधले उद्योग तसेच तिथले तंत्रज्ञानही पाश्चिमात्य देशांमुळे आहे. त्यांनी चीनशी फारकत घ्यायचे ठरवले तर चीनमधले उद्योगधंदे भारतात येण्याची दाट शक्यता आहे. चीनमध्ये लोकशाही व्यवस्था असती आणि तिथल्या माध्यमांना वार्तांकनाबाबत स्वातंत्र्य असते, तर जगाला आधीच सतर्क करता आले असते. करोनाचे थैमान रोखता आले असते. हे सगळे ध्यानात घेऊन या पुढील काळात चीनवर दबाव येण्याची दाट शक्यता आहे.
अनेक कारणांमुळे करोनानंतरच्या जगात भारताची प्रतिमा निश्चितच उंचावलेली आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व भारताला देण्याकरता सर्व देशांचा दबाव आणला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यात केवळ चीनने विरोध केला, तर बाकीचे देश एकत्र येऊन चीनलाच सुरक्षा परिषदेतून हाकलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चीन भारताला सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व द्यायला तयार होईल असं दिसतं. एकदा भारत राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेचे एक सदस्य म्हणून आला की, आपोआपच देशाचे राजकीय व आर्थिक वजन वाढेल, यात शंका नाही. अशा परिस्थितीत जग भारताकडे आशेने पाहणार असेल तर भारताला खंबीर भूमिका घेऊन पुढे यावे लागेल.
– ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)