Stray Dog – देशातील प्रसिद्ध चहा ब्रॅंडपैकी एक असलेल्या वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे नुकतेच निधन झाले. भटक्या कुत्र्यांनी (Stray Dog) केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशात दररोज किमान 10 हजार घटनांची नोंद होत असल्याची माहिती आहे.
भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळलेले नागरीक आणि श्वान प्रेमींमध्ये वाद झडत असतात. भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या चार ते सहा कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे.
संसदेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2019 ते 2022 या काळात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या किमान एक कोटी 60 लाख घटनांची नोंद करण्यात आली आहेत.
याचाच अर्थ या कालावधीत भटके कुत्रे चावल्याच्या दररोज किमान 10 हजार घटनांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली.
रेबीज या आजारामुळे दरवर्षी 21 हजार मृत्यू होतात, यातील 99 टक्के जणांना रेबीज लागण कुत्र्यांमुळे होते अशी जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. अनेकांकडून भटक्या श्वानांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तर, दुसरीकडे श्वानप्रेमींकडून याला विरोध केला जात आहे. मागील काही काळात विविध ठिकाणी भटक्या श्वानांनी लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.