सातारा -करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रयत्न करत आहे; परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती व नगरपालिका आपल्या अखत्यारीत गाव, शहर बंद ठेवून अन्य निर्बंध लादत होत्या. या प्रकारांना चाप लावत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पालिका, ग्रामपंचायतींना दणका दिला आहे. यापुढे कोणत्याही गोष्टी बंद अथवा सुरू ठेवण्याचा अधिकार फक्त जिल्हाधिकारी वा प्रांताधिकाऱ्यांनाच असतील, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता नागरिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचे अधिकार ग्रामपंचायती अथवा पालिकांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत माहिती अशी, जिल्ह्यात करोनाने हाहाकार माजवला असून बाधितांची एकूण संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे. करोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव ग्रामीण भागात अधिक आहे. ग्रामीण भागात अथवा काही नगरपालिका क्षेत्रात सरपंच किंवा नगराध्यक्षांच्या आदेशानुसार गावे, शहरे तीन-चार दिवसांसाठी बंद केली जात होती. यात अत्यावश्यक सेवा व दुकाने वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवले जात होते.
जिल्ह्यात असा पायंडाच पडला होता; परंतु यापुढे जिल्ह्यातील ग्रामपंचायती अथवा पालिकांना जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे गाव बंदची घोषणा करता येणार नसल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केल्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रे वगळून इतर ठिकाणी दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.