Priyanka gandhi on bjp : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून सुरू झाला असून यात्रेत सहभागी झालेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले त्यांच्या घरावर बुलडोझर चालले का, ज्यांनी महिलांवर अत्याचार केले त्यांच्या घरांवर बुलडोझर चालले का असे टोकदार प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.
प्रियंका गांधी म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात पुन्हा पुन्हा भाजपचे सरकार येते आहे आणि तुमची बेरोजगारी वाढते आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलन करत होते. आजही शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यावेळीही त्यांचा आवाज ऐकणारे कोणी नव्हते आणि आजही ऐकणारे कोणी नाही. यांचे बुलडोझर जेंव्हा जेंव्हा चालते तेंव्हा ते कोणाच्या घरावर चालते? सहा शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांवर आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर ते का चालत नाहीत?
दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर बेरोजगारीचा दर वाढला आहे. जोपर्यंत तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत, सुविधा मिळणार नाहीत, पेपर फुटीचे प्रकार थांबणार नाहीत तोपर्यंत विकास होणार नाही. तुम्ही तुमच्या आलेल्या अनुभवाच्या आधारावर जेंव्हा मतदान कराल तेंव्हाच बदल होईल असंही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की तुम्हाला द्वेष करायला शिकवले जाते, धर्माच्या आधारावर परस्परांशी लढायला सांगितले जाते. एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवले जाते.एका भाषेचे दुसऱ्या भाषेशी भांडण लावले जाते आणि मग २४ तास तुमची लूट केली जाते. त्यांना ९० टक्के लोकसंख्येचा रस्ता बंद करायचा होता म्हणून अग्निवीर योजना आणली गेली. भाजपची ही पध्दत आहे. एक व्यक्ती लक्ष विचलित करतो. ते कधी कधी बॉलिवुडबद्दलही बोलतात. कधी सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलतात आणि असे करून तुमचे लक्ष अन्यत्र वळवतात. तसे झाले की मग मागून अदानी येतात आता तुमचा खिसा रिकामा करतात. अमित शहा हे सगळे गप्प बसून पाहत असतात. कोणी काही बोलले की त्यांच्याकडे मी पाहतो असे ते म्हणतात. | Priyanka gandhi on bjp
देशातील ५० टक्के लोक मागासलेले आहेत. १५ टक्के अल्पसंख्यक आहेत. १५ टक्के दलित आहेत, ८ टक्के आदिवासी आहेत. या ९० टक्के लोकांची देशात किती भागिदारी आहे, कोणी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की भारत सगळ्यांचा आहे जर ९० टक्के लोकांची कशात भागिदारीच नसेल तर भारत सगळ्यांचा कसा असेल असा सवालही राहुल गांधी यांनी केला. | Priyanka gandhi on bjp