गाझियाबाद – मोदींनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या कामाचा हिशेब मागण्याऐवजी पाच वर्षांत तुम्ही काय केले, त्याचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवावा. कॉंग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रोड शोमधून प्रियांका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटे बोलत आहेत. अशी टीका प्रियांका यांनी मोदींवर केली.
भाजपाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील एकाही यशस्वी कामाबद्दल ते सांगू शकत नाहीत. ते आमच्या परिवाराचा द्वेष करतात. नेहरूंनी हे केले, इंदिराजींनी ते केले, पण मोदीजी तुम्ही काय केले ? असा सवालही प्रियांका गांधींनी यावेळी उपस्थित केला आहे. जीटी रोडवरून काढलेला रोड शो संपल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना प्रियांका गांधी संबोधीत करत होत्या. स्वतःचा लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीत मोदी कधीही कोणत्या गावात गेलेले नाहीत, ते फक्त इथे येऊन भाषणे देतात.
पाच वर्षांत वाराणसीतल्या कोणत्या गावात जाऊन आपण गरिबांशी पाच मिनिट देखील बोललात का हे देखील त्यांनी सांगावे. ते पूर्ण जग फिरले आहेत. त्यांनी जपानच्या लोकांची गळाभेट घेतली. अमेरिकेतील लोकांना मिठी मारली, पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, चीनमधल्या लोकांचीही गळाभेट घेतली; परंतु वाराणसीतल्या एकाही गरीब कुटुंबांची कधी गळाभेट घेतलीत काय?, असा प्रश्नही प्रियांका गांधी विचारला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही प्रियांका गांधींनी पंतप्रधनांवर घणाघाती टीका केली आहे.