आ. मकरंद पाटील यांना “किसन वीर’च्या संचालकांचा इशारा
भुईंज – विधानसभेत तोंडावर बोट आणि हाताची घडी घालून बसलात. मतदारसंघात स्वत:च्याच लोकांची जिरवाजिरवी केल्याने आता बोलायला तोंड नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत कारखान्याच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आ. मकरंद पाटील यांना नाही. खासगी कारखान्याच्या दलालांनी प्रथम हिंदुस्थान शुगर्ससाठी शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत करावेत. सूतगिरणीला लागलेले टाळे काढावेत, अशी घणाघाती टीका किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी पिसाळ व पै. मधुकर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
जय-पराजयाचे सांगता कोणाला?
राजकारणात जय-पराजय होत असतो. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त विजय पाहिले आहेत. मात्र, तुमच्यासारखा उन्माद आमच्या नेत्याने केला नाही. तुमच्या घराचे सत्तेतील बाळंतपण ज्या ओझर्डेच्या हणमंतराव पिसाळांच्या मताने झाले, त्यांच्याशी तुम्ही कृतघ्न झालात. पक्षनिष्ठेच्या गप्पा मारण्यापूर्वी 1990 साली पक्षनिष्ठा तुम्ही सर्वप्रथम गुंडाळली, हे विसरू नका. त्यानंतर आपले राजकीय पुनर्वसन कुणी केले, हे अंतर्मनाला विचारा. कारखान्याचे चेअरमन केले नसते तर आज कुठे असता? कारखाना, दोन विधानसभा निवडणुकांमधील पराभव तुमच्याही नावावर आहेत. त्यामुळे जय-पराजय आम्हाला सांगू नका, असेही पिसाळ व शिंदे यांनी ठणकावले आहे.
बावधन, ता. वाई येथील कार्यक्रमात आ. मकरंद पाटील यांनी माजी आमदार मदन भोसले यांच्यावर टीका केली. त्याचा समाचार पिसाळ व शिंदे यांनी घेतला आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, बावधनमध्ये सूतगिरणी सुरू करण्यासाठी जिल्हा बॅंकेने का मदत केली नाही? सूतगिरणी डब्यात जावी यासाठी कशा हुलंगड्या केल्या? नागेवाडी मीच केले, जललक्ष्मी मीच केली, अशी शेखी मिरवताना आधीच्या लोकप्रतिनिधींचे काहीच योगदान नाही का, याचा खुलासा करावा.
पक्षनिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी स्वतःचे मुखकमल आरशात पहावे. 1990 साली हत्तीवर बसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरद पवार, मदनराव पिसाळ यांच्याशी केलेली गद्दारी कुठल्या कुंभमेळ्यात आंघोळीने धुतली ? त्यावेळी पक्षाच्या विरोधात लढवलेली निवडणूक कोणत्या पक्षनिष्ठेत बसते? स्वतःच साधणे, हाच आमदारांचा एकमेव धंदा आहे. जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी दोन भाऊ का? पक्षासाठी झिजणाऱ्यांपैकी एक जणही लायकीचा वाटला नाही का, याचे उत्तर द्या आणि मग निष्ठेच्या गप्पा मारा. कुटाळक्या, चेष्टा करून मापं काढण्यात धन्यता मानण्याऐवजी स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय ते पहा.
किसन वीर कारखान्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. किसन वीरला ऊस देऊ नका, असे सांगत फिरणारे खासगी कारखान्यांचे दलाल आहेत. ज्यावेळी कारखाना आम्ही विश्वस्त म्हणून चालवू लागलो, तेव्हा तुम्ही केलेली घाण काढण्यात बराच काळ गेला. तेव्हा कामगारांची काय परिस्थिती होती? किती पगार थकले होते? कामगारांच्या पतसंस्था तुम्हीच कशा अडचणीत आणल्या होत्या, याची माहिती घ्यावी मगच बोलावे.
हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. मात्र, तो अडचणीत यावा म्हणून तुम्ही किती जणांचे उंबरे झिजवले, हे आम्हाला माहिती नाही का? खासगी कारखान्याची दलाली मिळतेय म्हणून मातृसंस्थेच्या लिलावाचा प्रयत्न करण्याचा प्रकार केविलवाणा आहे. समोरासमोर येण्याची भाषा करत असाल तर एक कोटीच काय, पाच-पाच कोटी रुपये मंजुरीची कागदपत्रे घेऊन येऊ. वेळ, तारीख आणि ठिकाण कळवा, असे आव्हान पिसाळ व शिंदे यांनी दिले आहे.