दत्ता पवार
कडेगाव – राजकारणाला मित्रत्वाचं वावडं नसतं. हल्लीच्या राजकारणाचा पोत एक पाऊल पुढं आहे. राजकारण्यांच्या घसरत्या पातळीवर भरवसा कसा ठेवावा. निवडणुकीचा हंगाम घोंगावत आहे. रोज पक्षांतराच्या बातम्यांनी मती गुंग केली आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधक भेटतात, मग लगेच बातमी बाहेर येते. अशीच बातमी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची आली होती. तेव्हापासून संशयकल्लोळ उठला आहे. अलीकडे आमदार विश्वजितांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क वाढला आहे. मतदारसंघाच्या प्रश्नावर उभयतांच्या भेटी होत आहेत. या भेटीचा आमदार साहेब खुलेपणाने जाहीर उहापोह करतात. मुख्यमंत्र्यांशी डॉ. विश्वजीत यांची जवळीकता चर्चेचा विषय बनली आहे.
दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचे राजकारणात वजन मोठे होते. सत्तेच्या माध्यमातून त्यांचे, विविध पक्षातील नेत्यांशी, मैत्रीचे संबंध होते. त्यांनी निर्माण केलेल्या मैत्रीचा लाभ, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना होत आहे. पतंगराव कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात मोठा विकास केला आहे. तो पुढे नेण्याची जबाबदारी आमदार विश्वजीत कदम यांच्यावर आली आहे. मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्नावर डॉ. विश्वजीत सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. विकास कामे मार्गी लावून घेतात.
स्व. डॉ. पतंगराव कदम यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळची मैत्री होती. हाच मैत्रीचा धागा आमदार विश्वजीत पुढं घेऊन निघाले आहेत. त्याला मुख्यमंत्री साथ देत असल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी डॉ. विश्वजीत कदम भाजपात जाणार अशी आवई उठली होती, ती त्यांच्यातील विकासात्मक भेटीगाठी मुळेच. यावर आमदार कदम यांनी खुलासाही केला होता. डॉ. विश्वजीत कदम यांनी विकासात्मक कामे मंजूर करून आणल्यानंतर खुल्या मनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचे सांगत आहेत. महापूर काळात त्यांनी चांगले काम केल्याचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पूरग्रस्तांना मदत करावी म्हणून आमदार कदम यांनी भेटून निवेदन दिले.