पुणे – दहा ते पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसाला सुरवात झाल्याने उत्साह थोडा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचा हा जोर आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. असे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात गेले दोन दिवसांपासून मराठवाडा आणि कोकणात पाऊस पडत आहे पण आज त्यांना संपुर्ण राज्य व्यापले आहे. कोकणात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रायगड रत्नागिरी ठाणे कोल्हापूर या जिल्ह्यात तर काही ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथे तब्बल 167 मिलीमीटर पाऊस झाला आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये ही धुवाधार पाऊस कोसळत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात ही पावसाचा जोर वाढल्याने या धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला पुर आला आहे. कोयनेतून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकले आणि मान्सूनचा असा सुद्धा त्याच दरम्यान असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे.
गेले दोन दिवसांपासून कोकण आणि विदर्भ, मराठवाड्यात ढगांची दाटी होत आहे तर पावसाला पोषक वातावरण असल्यानेच राज्यात ढग निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासात कोकण घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.त्याचबरोबर पुणे कोल्हापूर साताऱ्याच्या घाट माथ्यावर आणि पुर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.