नवी दिल्ली : चीनसह काही देशांमध्ये पुन्हा करोनाने आपले हातपाय पसरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार २४ तारखेपासून परदेशातून आलेल्या २ टक्के प्रवाशांची क्रमविरहित करोना चाचणी केली जाणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशात करोनाबाबत खबरदारीचे उपाय राबवण्यात येणार आहेत.
पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशातील करोनाची सद्य:स्थिती, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची सज्जता, लसीकरण मोहिमेची परिस्थिती, करोनाचे उत्परिवर्तित विषाणू आणि त्याच्या परिणामांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने निवेदन जारी करून करोनाबाबत उपाययोजनेमध्ये आत्मसंतुष्ट राहू नका आणि सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणांमध्ये सुधारणा करा, अशी सूचना राज्यांना केली.
नागरिकांनी करोनाबाबत योग्य जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले असून, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना केली आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात, नववर्ष स्वागतावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना अधिक सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अधिक धोका असलेल्या आणि वयोवृद्ध नागरिकांना करोना लशीच्या वर्धक मात्रेमुळे (बूस्टर डोस) फायदा होईल, असे ते म्हणाले.
तर दुसरीकडे राज्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तापमान तपासणी (थर्मल टेिस्टग) केली जाईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर राज्य सरकार योजत असलेल्या उपायांची सावंत यांनी माहिती दिली. राज्यात ओमायक्रॉनच्या ‘बीएफ-७’ या उत्परिवर्तित विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.