मुंबई – काल (सोमवार, दि.7) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्राला कोविड स्प्रेडर म्हणून संबोधले. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभेतील आपल्या भाषणात महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा बुधवारी (दि.9 फेब्रुवारी) राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली जातील, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे.
तसेच राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रति थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल. अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी भाजपावर केली आहे.