टप्पा क्रमांक दोनमधील स्थिती : कचऱ्याची समस्या झाली उग्र
शिंदे वासुली – खेड तालुक्यातील शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी, वराळे आदी गावांमध्ये चाकण एमआयडीसी टप्पा दोन अंतर्गत औद्योगिक विकास होत असताना नागरिकरण वाढून उद्योग-व्यावसाय भरभराटीस आले; परंतु त्यामानाने पिण्याचे पाणी, सांडपाणी, पार्किंग व कचरा व्यवस्थापन यासारख्या गावातील नागरी सुविधा तोकड्या पडलेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेषत: कारखानदारी, रहिवासी, उद्योग, व्यापारामुळे कचरा विल्हेवाट अत्यंत गंभीर समस्या होऊ लागली आहे.
औद्योगिक परिसरातील शेती क्षेत्र अत्यल्पच म्हणजे 1:4 इतकेच शिल्लक आहे. यापूर्वी शेतकरी घरातील, गोठ्यातील केरकचरा खड्डा घेऊन कंपोस्ट खत तयार करुन शेतीसाठी उपयोग करत असत; परंतु आता शेतीची जागा कंपनी, हॉटेल, उद्योग व्यावसायाने घेतली आहे. औद्योगिकीकरणामुळे या गावांमध्ये कुशल-अकुशल कामगार मोठ्या संख्येने वास्तव्याला आल्यामुळे स्थानिकांनी आपल्या शिल्लक जागेत भाड्याच्या खोल्यांच्या इमारती बांधल्या.
त्या कामगारांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने झाली. त्यामुळे औद्योगिक परिसरातील सगळ्याच गावांमध्ये रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत कचऱ्याचे पेव फुटलेले दिसतात. कचरा कुठेही कसाही टाकला जातो. हॉटेल व चिकन-मटन शॉपमधील वेस्टेज व कचरा सडल्यामुळे दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच या वेस्टेजमुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना दुर्गंधी व भटक्या कुत्र्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एमआयडीसी व स्थानिक ग्रामपंचायतींनी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
एमआयडीसी बाधीत गावांपैकी सावरदरी, भांबोली व शिंदे या गावांना सरकारी गायरानाची जागा उपलब्ध आहे. पैकी शिंदे गावाला गायरान असले तरी ते महाराष्ट्र शासनाने एमआयडीसी करीता संपादित केले आहे. या ग्रामपंचायतीने गावातील मुलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करून गावच्या विकासासाठी एमआयडीसीकडे 25 एकर जागेची मागणी केली आहे. प्रशासनाने त्यास तत्वत: मान्यता दिली असून ग्रामपंचायतीकडे रितसर हस्तांतरित केले नाही. त्यामुळे इच्छा व निधी उपलब्ध असूनही कचरा विल्हेवाट उपक्रम राबवू शकत नसल्याचे शिंदे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. तुर्तास ठिकठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
वासुली व वराळे या ग्रामपंचायतींना गायरान नाही किंवा स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींनी एमआयडीसी प्रशासनाकडे कचरा व्यवस्थापनासाठी जागेच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या वतीने एमआयडीसीला जागेच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे.
तसेच वराळे ग्रामपंचायतीने घंटागाडीची व्यवस्था केली असून एमआयडीसी जो पर्यंत जागा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत एमआयडीसीच्या मोकळ्या जागेत कचरा साठवला जातो आहे, अशी माहिती वराळेचे सरपंच बेबीताई बुट्टे पाटील व उपसरपंच सागर आंद्रे यांनी दिली.
एमआयडीसी परिसर व रस्त्यावरील कचरा प्रश्न लवकरच सुटणार असून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीकरिता पाठवला आहे. आमचा प्रकल्प स्वतंत्र असून प्रत्येक गावाने आपापल्या पद्धतीने व्यवस्था करावी. ग्रामपंचायतींचे जागेच्या मागणीचे दिलेले प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले
जातील. – अतुल ढोरे, अभियंता, चिंचवड
वासुलीत घंटागाडी सुरू करणार – वासुलीमध्ये कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्यांच्या सहकार्याने घंटागाडी लवकरच सुरू करणार असून कचरा साठवणूक व विल्हेवाट प्रकल्पाची समस्या एमआयडीसीच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख यांनी सांगितले.
सावरदरी, भांबोलीचा खत निर्मिती प्रकल्प सुरू
कचरा प्रश्न सोडवण्यात सावरदरी व भांबोली आघाडी घेतली असून या दोन्ही ग्रामपंचायतींनी एमआयडीसीतील कंपन्यांचे सहाय्य घेत कचरा संकलीत करून ओला-सुका कचरा वर्गीकरणानंतर खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे, असे भांबोलीचे सरपंच सागर निखाडे व सावरदरीचे उपसरपंच गणेश पवार, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे यांनी सांगितले.