कल्पेश भोई
चाकण – चाकण पंचक्रोशीसह संपूर्ण खेड तालुक्यात रोज नव्याने दाखल होणार्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकरी शेती व्यवसायापासून दूर होत असल्याची साशंकता निर्माण होऊ लागली आहे. औद्योगिक वसाहतीचे चार टप्पे पूर्ण होऊनही पाचव्या टप्प्यासाठी जमीन भूसंपादन सुरू आहे. याशिवाय रिंगरोडसाठी लागणार्या जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आल्याने विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्पांचा दट्ट्या खेड तालुक्याच्याच वाट्याला कार असा प्रश्न आता नागरिकांना भेडसावत आहे.
प्रकल्पांसाठी जमिनीचे संपादन होवू लागल्याने जणू काही प्रकल्पांनीच शेतीला डंख मारल्याने शेतकरी उद्ध्वस्त होतो की, काय अशी भीती निर्माण झाली आहे. रिंगरोड, रेल्वे व संभाव्य पुणे-नाशिक सहापदरी महामार्ग यासाठी होणार्या भूसंपादनामुळे भूमिपुत्र व येथील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गाच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी अवश्यक असणार्या जमिनीचे अधिग्रहण जवळपास पूर्ण झाले आहे. आता प्रतिक्षा काम सुरू होण्याची आहे. याशिवाय खेड तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा प्लॉटिंग व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. सुमारे 1 ते 2 हजार ठिकाणी एक, दोन गुंठ्याची विक्री होत असल्याने अशा अनेक कारणांमुळे शेती व्यवसायाला घरघर लागली आहे . पिढीजात असलेल्या पारंपरिक शेतीचा विषय दिवसेंदिवस पूर्णपणे कोलमडून पडत चालला आहे.
खेड तालुक्याला अनेक प्रकल्पांनी चोहोबाजूंनी घेरल्याने शेतीप्रधान असलेल्या या तालुक्यातील शेत जमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित होत चालल्याने शेतकर्यांना देशोधडीला जाण्याची वेळ आली आहे. सरकारी पड जमिनीवर प्रकल्प उभे न करता शेतकर्यांच्या पिकांच्या जमिनी संपादित होत असल्याने यातून आपली जमीन वाचवण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता आंदोलन करतात; परंतु त्या आंदोलनाला अपेक्षित यश मिळत नसल्याचे दुर्दैव आहे.
शासन दरबारी हेलपाटे
चाकण औद्योगिक वसाहतीचे एकूण चार टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये तालुक्याच्या पूर्व पश्चिम आणि दक्षिण भागातील गावांमध्ये हजारो हेक्टर जमिनीवर राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. तर पाचव्या टप्प्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे; परंतु स्थानिक तरुणांना कंपन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी रोजगार आणि नोकरी आजपर्यंत मिळालेली नाही. अनेक शेतकर्यांच्या जमिनीचा सावळा गोंधळ अजूनही सुरू आहे. शासन दरबारी हेलपाटे मारून शेतकर्यांचे प्रश्न अद्यापही सुटले नसल्याने भूमिपुत्र त्रस्त आहेत.
शेतकरी तुरंगात अन् मोजणी पूर्ण
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरणार्या रिंगरोडच्या दुसर्या टप्प्यातील पूर्व रिंगरोडची जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. ज्या खेड तालुक्यातून शेतकर्यांनी आंदोलनातून मोठा विरोध केला, त्या भागातील शेतकरी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात असतानाच अत्यंत वेगाने संपूर्ण मोजणी पूर्ण करण्यात प्रशासनाने यश मिळवले.
विश्वासात न घेता…
रिंगरोड व रेल्वे प्रकल्पांसाठी शेतकर्यांच्या जमिनी जाणार असल्याने भूमिपुत्र उद्ध्वस्त होवू शकतो. प्रशासनाने त्यासाठी नवीन प्रकल्प आणताना सर्वांना विश्वासात घेणे अपेक्षित वाटते. जिल्ह्याबाहेरून येणार्या वाहनांमुळे चाकण एमआयडीसीत होणारी वाहतूक कोंडी, वाढते अपघात, ध्वनी प्रदूषण यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. कोणाचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. कोणाला विश्वासात न घेता केवळ विकासाच्या नावाखाली नवनवीन प्रकल्प खेड तालुक्यात आणून शेतकर्यांच्या माथी मारणे चुकीचे असल्याचे मत या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत .