पुणे – एका बाजूला शासन पुणे महापालिकेतून गावे वगळून नवीन नगरपरिषद स्थापन करण्याच्या सूचना देते. तर, दुसऱ्या बाजूला नगरपरिषदांची मिळून महापालिका स्थापन करण्याबाबत अहवाल मागवते. अशी दुहरी भूमिका असताना राज्य शासनाने आता चाकण, आळंदी आणि राजगुररूनगर नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या गावांची मिळून नवीन महानगरपालिका स्थापनेबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आयुक्त, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडून मागवला आहे. शासनाच्या या पत्रामुळे आता पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका स्थापनेबाबतच्या कागदोपत्री हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
मध्यंतरी शासनाने पुणे महानगरपालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळून या दोन गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन अहवाल शासनाला सादर केला आहे. दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवड हद्दीत मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महानगरपालिकांची हद्दवाढ झालेली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही. तसेच चाकण, आळंदी आणि राजगुररूनगर नगरपरिषद आणि परिसरातील गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याचा शासन विचार करत आहे. त्यामुळे नगरविकास विभागाने जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल मागविला आहे.
अहवालात ही माहिती मागितली
चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर नगरपरिषद तसेच नगरपरिषदांच्या हद्दीलगतच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द आदी तपशील घेऊन स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याबाबत अहवाल द्यावा. या अहवालात अधिकाऱ्यांनी स्पष्ट अभिप्राय नोंदवावा, अशा सूचना नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.
अजितदादांनी केले होते सुतोवाच
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात नदीच्यापलीकडे नवीन महानगरपालिका स्थापन करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार चाकण परिसरात नवीन महानगरपालिका स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.