बाळासाहेब वाबळे
काऱ्हाटी -मार्चपासून करोनाची शेतकऱ्यांना बसलेली झळ, हिरावलेला रोजगार, ग्रामीण अर्थकारणातील ठप्प चक्र, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीचा सामना आदी घटकाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीचा भाव मिळत आहे. अतिवृष्टीत मातीमोल झाल्यानंतर आता शेतीमालाचा भाव कडाडले आहेत. त्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वसामान्यांच्या पदरात महागाई, शेतकऱ्यांना कवडीचा भाव, अशी अवस्था दोन्ही घटकांची झाली आहे.
बारामती तालुक्यातील सुपे परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला शेतीमाल सडून गेला आहे. त्यामुळे वर्षभराची कमाईची माती झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील असमतोलपणा सर्वसामान्यांना घायाळ करीत आहे. महागाई आ वासून उभी आहे. त्याचा परिणाम शेतकरी आणि ग्राहकांना बसत आहे. बाजारपेठमध्ये फळे व भाजीपाल्याची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाजीपाला व फळांच्या दरावर झाला आहे. त्यामुळे मागील चार आठवड्यांपासून सतत दरवाढ होत आहे.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. काही दिवसांपासून शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल केल्याने बाजारपेठेत रेलचेल वाढलेली आहे. काही व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तरी गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे तीन ते चार आठवड्यापासून भाजीपाल्याचे दर सतत वाढत आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहक भाजीपालाकडे कानाडोळा करीत आहेत. सध्या काही दिवसात भाजीपाल्यांच्या दरात घट येणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. फळांच्या दरात वाढ परिसरात येणाऱ्या फळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सध्या फळांच्या दरात वाढ झाली आहे. सफरचंद 150 ते 200 किलोने विकले जात आहे.
किराणाचे भाव स्थिर, भाज्या महाग
मागील महिन्यापासून किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. सध्या बाजारपेठेत शेंगदाण्याचे दर 100 ते 120 रुपये, साखर 35 ते 40, गूळ 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे आहे. सोयाबीन 80 ते 110 रुपये, सूर्यफूल तेल 130 ते 150 रुपये किलोप्रमाणे किरकोळ दरात मिळत आहे. अतिवृष्टीमुळे मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. बाजारात टोमॅटोची 20 ते 30 रुपयांची विक्री, मिरची नव्वद ते शंभर रुपये, कांदा 60, बटाटा 30 ते 40 रुपये, मिरची 80, भेंडी 30 ते 40 रुपये किलोने विक्री होत आहे.