मुंबई : राज्यात सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकारावरून विरोधकांनाही सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, हे सर्व सुरु असताना आता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणदेखील पुन्हा समोर आले होते. याच मुद्द्यावरून अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. मागील सरकारने वडिलांचे आत्महत्या प्रकरण दाबले असल्याचा नाईक यांच्या मुलीने आरोप केला.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा दाखल देत आज्ञा नाईक यांनी, इथे इतरांना लगेच न्याय मिळत आहे. केवळ संशय असला तरी लगेच (सचिन वाझे) बदल्या केल्या जात आहेत. कारवाई होत आहे. विधानसभा पूर्ण हादरवली जात आहे. मग आम्हालाच न्याय का नाही मिळत, असे त्यांनी म्हटले. तुम्ही अंबानी असाल तरच न्याय मिळणार का? आमच्या प्रकरणात तर सुसाईड नोट आहे, मग या न्यायव्यस्थेला काय अर्थ? असा सवाल आज्ञा नाईकने विचारला. सुप्रीम कोर्टाने फक्त अंतरिम जामीन दिला आहे, निकाल नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, असे आज्ञा नाईक यांनी म्हटले.
आम्हाला धमक्या येत आहेत. प्रभादेवीमध्ये मारणार, बघतोच तुझा व्यवसाय होतो, आताच कुठे खेळ सुरू झालाय, अशा धमक्या दिल्या जात आहेत. हे प्रकरण दाबलं हे नक्की मात्र त्याची चौकशी करावी. मागील सरकारची पूर्णपणे चौकशी व्हायलाच हवी, असे आज्ञा नाईक यांनी म्हटले.
माझ्या पतीच्या आत्महत्येची मुद्द्यावर बोलण्याऐवजी सातबाऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. जमिनी विकणे हा गुन्हा आहे का? तो आमचा व्यवसायच आहे, असं अक्षता नाईक यांनी म्हटले. जमिनी विकण्याचा आमचा व्यावसायिक मुद्दा आहे. त्याचा आणि आत्महत्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. आठ वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मागच्या सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले आहे, असा आरोप अक्षता नाईक यांनी केला. सरकारने SIT नेमायला उशीर केलाय, पण देर आये दुरुस्त आये. आता मात्र न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना नक्कीच भेटणार, असेही अक्षता नाईक यांनी सांगितले.