सव्वा लाख नागरिकांवर केली कारवाई
पिंपरी – सरकारने संचारबंदी लागू केली. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. करोनाच्या काळात कारवाई करताना अनेकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तर काहींनी पोलिसांवर थेट हल्लेही केले. यामुळे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये पोलिसांवर अधिक हल्ले झाले. मात्र प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्या एक लाख 24 हजार 117 जणांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे आणि खटले दाखल केले.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती रुग्णालयात करोनाची लढा देत होत्या. तर नागरिकांमध्ये होणारा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. या संचारबंदीतून काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत अनेक टवाळखोर काहीही निमित्त काढून शहरात फिरत होते. अशा टवाळखोरांना रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर होती.
त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. गल्लोगल्ली गस्त वाढविली. दिलेल्या वेळेत दुकाने आणि आस्थापना बंद न करणाऱ्यांवर पोलीस खटले आणि गुन्हे दाखल करू लागले. यातून दुकानदार आणि टवाळखोरांशी वाद होऊन पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या.
दोन कोटींचा दंड वसूल
गेल्या मार्च महिन्यांपासून पोलिसांनी भा. द. वि. कलम 188 प्रमाणे एक हजार 897 गुन्हे दाखल केले. याच कलमान्वये शहर पोलिसांनी 57 हजार 611 खटले तर वाहतूक पोलिसांनी 25 हजार 435 खटले असे एकूण 83 हजार 046 खटले दाखल केल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी नोंद आहेत.
विना मास्क फिरणाऱ्या 39 हजार 174 जणांवर महापालिका प्रशासनाच्या मदतीने पोलिसांनी कारवाई केली. या सर्व कारवाईमध्ये पोलिसांनी दोन कोटी, चार लाख, 84 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला. अशाच कारवाया पोलिसांवरील हल्ले वाढविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.