मुंबई – मुंबईतील एका भूखंड व्यवहारप्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, मातोश्रीबद्दल निष्ठा असलेल्या रवींद्र वायकर यांची स्थिती अद्यापही संभ्रमाचीच आहे. त्यांना शिंदे गटात न जाता ईडीच्या ससेमिऱ्यातून सुटका हवी असल्याचे त्यांच्या एका निकटवर्तियाने सांगितले.
शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या प्रमुख नेत्यांची एका पाठोपाठ एक अशी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. त्यात प्रामुख्याने खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल परब, माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच माजी मंत्री रवींद्र वायकर यांचा समावेश आहे.
मैदानासाठी राखीव ठेवण्यात आलेला महापालिकेचा आठ हजार चौरस मीटरचा भूखंडावर उभारलेले पंचतारांकित हॉटेल तसेच मनी लॉंड्रिंगप्रकरणी रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू असून अलीकडेच 17 आणि 23 जानेवारी तसेच 10 फेब्रुवारी असे तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.
ईडीने चौकशीचा फास आणखी आवळल्यानंतर मला अटक होऊ शकते. अशा परिस्थितीत रवींद्र वायकर आता आणखी आपल्यासोबत कोण बाहेर पडू शकतो, याची चाचपणी करत आहेत. आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही. केवळ राजकीय सूडापोटी आपली चौकशी सुरू आहे आणि यात माझा बळी जाण्याची शक्यता आहे, असे वायकर यांना वाटत असल्याचे निकटवर्तीयाने सांगितले. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नीमागे देखील चौकशीचा ससेमिरा लागल्याने रवींद्र वायकर जास्त व्यथित झाले असल्याचे त्याने सांगितले.