पिंपरी – लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे सहा ते सात महिने उरले आहेत. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहर येते. या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मार्च ते मे 2024 दरम्यान लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
मागील लोकसभा निवडणुका शिवसेना-भाजप युतीने सोबत लढल्या होत्या. यंदा राज्यातील 48 पैकी 45 जागा महायुतीने जिंकण्याचा निर्धार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील बदलेली समीकरणे, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा सहभागी झालेला अजित पवारांचा गट यामुळे राज्याचे राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मूळ पक्ष कोणाचा याचा वाद निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. बदललेल्या परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपचा मावळ लोकसभा प्रवास
भाजपच्या वतीने राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात तयारी करण्यात येत आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या आठवड्यात मावळ लोकसभा प्रवास या कार्यक्रमासाठी येणार आहेत. या अंतर्गत लोकसभा मतदार संघातील विविध भागात आढावा बैठका, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे मावळवर भाजपनेही चांगलेच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.
मनसेही उतरणार रिंगणात
मराठी माणसाचा आवाज दिल्लीत पोहोचविण्यासाठी काही जागावर निवडणूक लढविणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. मावळ आणि शिरूर लोकसभेवर मनसेने लक्ष केंद्रित केलं असून उमेदवार हे राज ठाकरे ठरवतील, अशी माहिती मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. उरण, पनवेल, कर्जत, मावळ, चिंचवड, पिंपरी असा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. मावळ लोकसभा हा भिन्न विचारांचा मतदारसंघ आहे. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत.
त्यामुळे कुठल्या एका मुद्द्यावर ही निवडणूक होणार नाही. मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे या मागची ही भूमिका आहे. महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. परंतु, महाराष्ट्राची ठाम भूमिका मांडताना दिसत नाहीत. पक्ष हित पहिले मग जनता अशा पद्धतीची खासदारांची स्थिती आहे. अनेक खासदारांच्या मागे सीबीआय, ईडी लागलेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
माजी नगरसेवकांना मावळचे आकर्षण
आतापर्यंत मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना सातत्याने विजयी होत आली आहे. खासदार श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा खासदार असल्यामुळे महायुती शिवसेनेला तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला येथून मैदानात उतरवेल अशी चर्चा असतानाच अन्य पक्षांनीही येथे चाचपणी सुरू केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार असू शकतो हे पाहता शहरातील भाजपच्या एका माजी नगरसेवकाने नुकतीच माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देखील एक माजी नगरसेवक इच्छुक असल्याचे बॅनर शहरात झळकले होते.