बेंगळुरू -आयपीएल स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच भारतीय संघ इंग्लंडला रवाना होत आहे. तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची ताकद समोर ठेवत त्यासाठी काही खास योजना तयार करण्याचे काम आजपासून (गुरुवार) एनसीएमध्ये (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) सुरू होत आहे.
या योजनांवर काम करण्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण व संपूर्ण भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ एकत्र येत आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर येत्या 7 ते 11 जूनदरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी तसे होऊ नये म्हणून या योजना तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघातील प्रत्येक खेळाडूसाठी म्हणजे फलंदाज व गोलंदाज यांच्यासाठी काही खास योजना तयार केल्या जाणार आहेत. त्यांचे कमकुवत दुवे, त्यांच्या खेळाचे रिप्ले तसेच त्यांच्या बाद होण्याच्या पद्धती व त्यातील कोणत्या पद्धतीने ते सातत्याने बाद होतात याचाही अभ्यास केला जाणार आहे.
तसेच त्यांची गोलंदाजीची ताकद, त्यांच्या कोणत्या गोलंदाजाकडे कोणती अस्त्रे आहेत, त्यासमोर आजवर कोणते भारतीय फलंदाज अपयशी किंवा यशस्वी ठरले आहेत, तसेच जे फलंदाज अपयशी ठरले आहेत ते यावेळी कसे यश मिळवतील याचा सर्वांगीण विचार केला जाणार आहे.
आयपीएल स्पर्धेत भारताच्या कसोटी संघातील काही प्रमुख खेळाडूही खेळत आहेत. त्यामुळे त्यांनाही सराव करताना तसेच सामना खेळताना दुखापती होणार नाहीत याची काळजी घेण्याचेही सल्ले दोण्यात आले आहेत. विशेषतः कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, महंमद शमी, महंमद सिराज यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
ब्ल्यू प्रिंटवर होणार चर्चा
या योजनांवर काम करण्यासाठी द्रविड यांच्यासह अकादमीचे संचालक लक्ष्मण, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप व संपूर्ण सपोर्ट स्टाफ यांची बैठकही येत्या दोन दिवसांत होणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ब्ल्यू प्रिंटवरही चर्चा केली जाणार आहे.