बीड – तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचे आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची, असा सवाल विचारत मनोज जरांगे यांनी मुंडे बहीण-भावावर हल्लाबोल केला. बीडच्या नांदुर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
या जखमी रुग्णांची मनोज जरांगे यांनी गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, मला सुद्धा धमकी देत आहेत, बघून घेऊ, कचाट्यात ये मारून टाकू, मला बीडमध्ये येऊ द्यायचे नाही, असे म्हणत आहेत.
आता तर मी रोज बीडमध्ये येणार, दोघे बहीण-भाऊ कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला नाव ठेवले त्यावेळेस विरोध केला.
पण मी एकदाही म्हणालो नाही पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार पाडा. पण हे आम्हाला माहिती आहे वेळ निघून गेले की असे होणारच. मी बलिदान देण्यासाठी तयार आहे.
मात्र, मी मागे हटणार नाही. मराठा समाजाचे असे उपकार फेडता का? तुमच्या व्यासपीठावर मराठा समाजातील नेत्यांना बसायला जागा नव्हती, असेही जरांगे म्हणाले.
मराठा समाजात मोठी खदखद
मराठ्यांची मते लागतात, मराठ्याचे नेते प्रचाराला लागतात. मराठ्याच्या मतांवर मोठे व्हावे लागते, पण अन्याय हा प्रत्येकवर्षी सुरु आहे.
स्वतःचे संकट अंगावर आहे त्यावेळेस आपला सहित पाया पडतात आणि संकट निघून गेले की लगेच बदलतात. आष्टी पाटोद्यात काय झाले, बीडमध्ये काय झाले, माजलगाव आणि परळीमध्ये काय झाले संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, असेही ते यावेळी म्हणाले.