करोनाव्हायरसमुळे पसरत असलेल्या कोव्हिड19 च्या फैलावाच्या सुरुवातीच्या काळात, युरोपियन लोक चेष्टेने असे म्हणत असत, की भारतासारख्या देशातली प्रदुषित हवा आणि अस्वच्छ पाण्यामुळे करोनाव्हायरस तेथेच मरून जाईल. अशा आशयाचे विनोदही युरोपात अनेकांनी समाजमाध्यमांत पाठवत, भारतासारख्या विकसनशील देशांवर टीका करण्याचा आनंद घेतला होता. मात्र, सुमारे सहा महिन्यांच्या काळात हा केवळ विनोद नसून, वस्तुस्थिती असल्याचे उघड झाल्याने, या विनोदाला वास्तवाची किना र लाभल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स सायन्स (एनसीसीएस) आणि चेन्नई मॅथेमेटिकल इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी यासंदर्भात सांख्यिकीय विश्लेषण केले असून त्याच्या अहवालानुसार, जेथील एकूण सार्वजनिक स्वच्छता फारशी चांगली नाही, पाणीसाठेही प्रदुषित आहेत आणि स्वच्छतेविषयी एकूणच अनास्था आहे, अशा भागांतील कोव्हिड19 च्या मृत्युंची संख्या ही अतिप्रगत आणि प्रदुषणमुक्त मानल्या जात असलेल्या युरोप- अमेरिकेपेक्षा कमी आहेत. त्यासाठी या अभ्यासांतर्गत संशोधकांनी 106 देशांतील कोव्हिड19 ने मरण पावलेल्या रुग्णांविषयी 25 ते 30 निकषांची तुलना करत आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यावरुन हा निष्कर्ष प्रसारीत करण्यात आला आहे. त्यामुळे अतीप्रगत देशांतील समाजशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
प्रदुषित पाणी आणि सामाजिक स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांमध्ये निसर्गत:च चांगली रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असते, जी करोनाव्हायरसला आपले हातपाय पसरु देत नाही. स्वच्छतेच्या अधिक चांगल्या पद्धतींमुळे एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि त्याला किंवा तिला स्वयंप्रतिकार रोगाचा त्रास होऊ शकतो. चांगल्या स्वच्छता, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, हात धुण्याची सुविधा आणि इतर स्वच्छता पद्धतींमध्ये सुधारणा केल्याने संसर्गजन्य रोगांचा प्रभाव कमी होतो. उलट संसर्गजन्य एजंट्सच्या संपर्कात येणारी घट म्हणजे ऑटोम्यून डिसऑर्डरच्या मोठ्या प्रमाणाशी संबंधित असू शकते, असे संशोधकांनी पेपरमध्ये नमूद केले आहे.
एनसीसीएसमधील संशोधक बिथिका चटर्जी आणि चेन्नई मॅथेमॅटिकल इंस्टिट्यूटमधील राजीव लक्ष्मण करंदीकर यांनी लोकसंख्याशास्त्र, संसर्गजन्य व संसर्गजन्य रोगांचे प्रमाण, बीसीजी लसीकरण स्थिती, स्वच्छता आणि कोविड मृत्युअ निकषांवर संशोधनाचे मापदंड तपासले आणि वरील निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत.