मुंबई : राज्यातील करोनाची लाट आता ओसरल्याचे दिसत आहे. त्यातच आता राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पालकांना आपलं मुल सुरक्षित राहील, अशी खात्री वाटत असेल, तरच त्यांनी मुलं शाळेत पाठवावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
करोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी, ‘करोना बाधित रुग्णांचा दर कमी असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ, टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा करून आता १ मार्चपासून जम्बो रूग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील करोना नियम शिथिलता बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. सध्या कोरोना आकडेवारी घट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. तसेच ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराचेही रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध घातले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर २४ जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या.
पालकांकडून संमतिपत्र घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. तसेच जे पालक आपल्या पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकरीता दृकश्राव्य माध्यमातून शाळा सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र मुंबईतील करोनाचा संसर्ग पूर्णपणे ओसरत असल्यामुळे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च २०२० मध्ये करोनाचा संसर्ग देशभरात सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आलेल्या शाळा दोन वर्षांनी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. यावेळी अपंगांच्या व विशेष मुलांच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.