का आणि एनआरसी लागू करून दाखवाच
भाजप आणि जेडीयूच्या मैत्रीबाबत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत
पाटणा : भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीयूचे उपाध्यक्ष आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले आहे. देशाला दिलेल्या ग्वाहीनुसार नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) लागू करून दाखवाच, असे किशोर यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप आणि जेडीयूच्या मैत्रीबाबत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
का-एनआरसीवरून सध्या देशभरात निदर्शनांचे सत्र सुरू आहे. त्या मुद्द्यांवरून मित्रपक्षांनीही विरोधाचा सूर आळवल्याने भाजप एकाकी पडू लागल्याचे चित्र आहे. जेडीयूमध्येही त्या वादग्रस्त मुद्द्यांवरून अस्वस्थता पसरल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारीच जेडीयूचे सरचिटणीस पवन वर्मा यांनी एक लेटरबॉम्ब फोडला.
त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उद्देशून लिहीलेले पत्र सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले. का-एनआरसीच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. तसे असताना जेडीयूने दिल्लीतही भाजपशी युती कशी काय केली, असा सवाल वर्मा यांनी केला.
एवढेच नव्हे तर, नितीश यांची भाजपविषयीची खासगीतील नाराजीही त्यांनी चव्हाट्यावर आणली. त्यांच्या पाठोपाठ किशोर यांच्यासारख्या जेडीयूच्या आणखी एका पदाधिकाऱ्याने भाजपवर शरसंधान केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले जाऊ लागले असल्याचे मानले जात आहे.