पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालात साताऱ्यातील प्रसाद चौगुले हे राज्यातून सर्वसाधारण वर्गवारीतून प्रथम आले आहेत. तर मागासवर्गवारीतून उस्मानाबाद जिल्ह्यातील रविंद्र शेळके, तर महिला वर्गवारीतून अमरावतीच्या पर्वणी पाटील ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
आयोगातर्फे दि. 13 ते 15 जुलै 2019 रोजी राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 420 पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाने आज जाहीर केला. सविस्तर निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कट-ऑफ) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा दि. 17 फेब्रुवारी 2029 रोजी मुंबईसह अन्य 38 जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेसाठी 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी 6 हजार 825 उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी 1 हजार 326 उमेदवार पात्र ठरले होते.