Kishoreraje Nimbalkar : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2025 पासून राज्यसेवा परीक्षा ही लेखी स्वरूपातच घेतली जाणार आहे.त्यात कोणतेही दुमत नाही. त्यामुळे लेखी परीक्षा 2023 की 25 याबाबत कोणतीही शंका राहिली नाही.एकविसाव्या शतकाकडे जाताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. तसेच संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल,असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी रविवारी पुण्यात स्पष्ट केले.
अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टातर्फे आयोजित ‘संवाद टॉपर्स मार्गदर्शन -राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना…’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किशोरराजे निंबाळकर बोलत होते.यावेळी अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया, वास्तव कट्टयाचे किरण निंभोरे, महेश बडे उपस्थित होते.कार्यक्रमात राज्यसेवा परीक्षेत मुलींमधून प्रथम आलेल्या पूजा वंजारी ,ओबीसी प्रवर्गातून द्वितीय आलेल्या सोनल सूर्यवंशी,नववी रॅंक मिळवणारे वैभव पडवळ आणि 28वी रॅंक मिळवणारे विशाल नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
किशोरराजे निंबाळकर म्हणाले,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हीरे निवडण्याचे काम करत असतो.काही विद्यार्थी मागणी करतात एकच उमेदवार अनेक पदांवर नियुक्ती मिळवतो. त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो.तसेच एखादा उमेदवार वारिष्ट पद मिळवत असेल तर त्यांच्यावर निर्बंध घालू नका पण एखादा वारिष्ठ पदावरून कनिष्ठ पदावर येत असेल तर त्यांच्यावर निर्बंध घाला,अशी मागणी करतात.त्यावर विचार होणे गरजेचे आहे.तसेच प्रशासनात येऊन प्रशासन खराब करू नका.जनसेवा हीच लोकसेवा आहे.हे समजून आपण काम करणे गरजचे आहे,असा सल्लाही किशोर राजे निंबाळकर यांनी दिला.
जीवन फार सुंदर असून जे यशस्वी झाले ते पुढे जातीलच पण जे मागे राहिले. त्यांनी प्रेरणादायी पुस्तके वाचून प्लॅन बी राबवणे गरजेचे आहे. चार अटेम्प्टपर्यंत ठीक आहे; परंतु त्यापुढे प्लॅन बी तयार ठेवणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करून किशोरराजे निंबाळकर म्हणाले,जेव्हा आम्ही संगणकीय डाटा चाळतो.त्यावेळी असे लक्षात येते परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यावर ट्रेनिंगचा कालावधी संपतो त्यावेळी अनेकांची 45 तर काहींची 38 वर्षे पूर्ण झालेली असतात.त्यामुळे सरकारी नोकरीचे आकर्षण असले तरी स्किल इंडियासारख्या उपक्रमातून उद्योग क्षेत्रात काम केले पाहिजे.तसेच परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर मोबाईलपासून व सोशल मिडियापासून दूर रहा, असे आवाहनही त्यांनी केले.
पूजा वंजारी म्हणाल्या, “तुमची इच्छा शक्ती आहे म्हणून तुम्ही येथे आलात.90 टक्के अभ्यास हा आपल्यालाच करावा लागतो. केवळ 10 टक्के मार्गदर्शनाचा फायदा होतो.परीक्षेला जाताना प्रत्येकाने सकारात्मक राहिले पाहिजे”.तर “अभ्यास करत्ना प्रश्नपत्रिका सोडवणे आणि गरजेचे आहे.त्याचप्रमाणे संकल्पना समजून घेऊन अभ्यास करावा”,असा सल्ला वैभव पडवळ यांनी दिला.”आपण स्पर्धेत उतरलेले अश्व आहोत. मनात आणले तरच आपण जिंकू शकतो. तसेच रिव्हिजन हाच यशाचा मार्ग असून त्यात सातत्य ठेवा अभ्यासाचा वेळा वाया जावू देऊ नका”,असा मोलाचा सल्ला सोनल सूर्यवंशी यांनी दिला .तसेच “अभ्यासाचे योग्य नियोजन करून नोट्स काढा.तसेच ही आपली शेवटची परीक्षा आहे, असे समजून प्रयत्न करा”,असे विशाल नवले यांनी सांगितले.
शैलेश पगारिया म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा मिळावी यासाठी आशा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजजन केले जाते. काहींची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना उचित मार्गदर्शन मिळत नाही.त्यामुळे अर्हम फाऊंडेशनतर्फे अशा कार्यक्रमातून दिशा दाखवण्याचे काम केले जाते.तसेच चुकून अपयश आल्यास प्लॅन बी कसा तयार करावा,याबाबतही मार्गदर्शन केले जाते.
दरम्यान, सर्व टॉपर्स यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या लहान मोठ्या टिप्स दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनाच्या प्रश्नांना उत्तरे दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश पगारिया यांनी केले.महेश बडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. सूत्रसंचालन अश्विनी टव्हारे यांनी तर आभार प्रदर्शन राहूल शिंदे यांनी केले.