– वंदना बर्वे
नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मंत्रीपद गमावलेल्या माजी मंत्र्यांना राजभवनात पाठविले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागच्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्या मंत्र्यांना मंत्रीपद गमवावे लागले त्यांना लवकरच लॉटरी लागणार आहे. या मंत्र्यांना राज्यपाल बनवून राजभवनात पाठविण्याची तयारी केली जात आहे.
भाजपातील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गेल्या विस्ताराच्यावेळी प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार यांचे मंत्रीपद गेले होते. या सर्व माजी मंत्र्यांना लवकरच राजभवनात पाठविले जाणार आहे. संतोष गंगवार हे आठवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यूपी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु, लाख प्रयत्न केल्यानंतरही मुलीला उमेदवारी नाही मिळाली.
यामुळे नाराज गंगवार यांनी पक्षातील बड्या नेत्याला फोन करून आपली व्यथा मांडली. ‘मी आठवेळा निवडून आलेला खासदार आहे. मात्र, मुलीला तिकीट नाही मिळवून देवू शकलो’, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली होती. तेव्हाच, त्या नेत्यांनी गंगवान यांना थोडा संयम बाळगण्याचा सल्ला दिला. पाच राज्यांच्या निकालानंतर तुम्हाला राजभवनात पाठविणार आहे, अशी हमी मिळाल्यापासून गंगवार शांत बसले. आता ते मोठी बातमी मिळण्याची प्रतिक्षा करीत आहेत.
महाराष्ट्रातील नेते आणि मोदी सरकारचे प्रवक्ते म्हणून काम पाहणारे प्रकाश जावडेकर यांनाही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते पर्यावरण मंत्री होते. याशिवाय, रविशंकर प्रसाद यांनाही मंत्रपद गमवावे लागले होते. ते कायदा तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्री होते. या दोन्ही माजी मंत्र्यांनाही राजभवनात पाठविण्याची तयारी असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.