किव्ह – युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारतातील एका इंग्रजी वाहिनीशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्यस्थीसाठी आवाहन केले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान भारत समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे, हे खरे आहे. युक्रेन हा नेहमीच भारताच्या अन्नसुरक्षेचा एक हमीदार देश राहिला आहे. आम्ही अनेक उत्पादने पुरवतो. हे परस्पररित्या लाभदायक संबंध आहेत, असे दिमित्रो यांनी म्हटले आहे.
जगात एकच व्यक्ती आहे ज्याला हे युद्ध हवंय आणि ती व्यक्ती म्हणजे व्लादिमीर पुतीन. हे युद्ध थांबवण्यासाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर आम्ही त्यांच्याविरोधात का असावे? रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे आणि लढाऊ विमानांसहीत प्रवेश करेपर्यंत युक्रेन हे अनेक भारतीयांसाठीही घर राहिले आहे.
या विद्यार्थ्यांनी परत यावे, अशी आमची इच्छा आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पुतीन हे निर्णय घेणारे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे हे युद्ध कसे संपवायचे, याबद्दल मोदींनी त्यांच्याशी थेट बोलणे आवश्यक आहे, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.
युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी अनेक पर्याय रशियासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. कीव्ह आणि चेर्नेगिव्ह शहरातून रशियाच्या घोषणेनंतरही लष्कर माघारी फिरलेले नाही.
काही शहरांतून रशियन लष्कर परत जाताना दिसत असले तरी त्याचा अर्थ संपूर्ण सेना परत जातेय, असा नाही. त्यामुळे आम्ही रशियन आश्वासनांवर सावध भूमिकेत आहोत. खोट्या आश्वासनांतून दिशाभूल करून पूर्व भागात हल्ले घडवून आणण्याची रशियाकडून खेळी खेळली जात असल्याची शक्यताही कुलेबा यांनी व्यक्त केली आहे.