प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिकांची नोंद आता मोबाइल ऍपद्वारे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील आठ दिवसांत राज्यातील 1 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी या ऍपमध्ये पिकांची माहिती फोटोसह नोंदवली आहे.
ई-पीक पाहणी ऍपचा सर्वाधिक वापर हा जळगाव जिल्ह्यात झाला असून या जिल्ह्यात 11 हजार शेतकऱ्यांनी तर पुणे जिल्ह्यात सुमारे 4 हजार शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केली आहे, अशी माहिती ई फेरफार प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
ग्रामीण भागात गावपातळीवर जमिनीचे महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना नं.7 हा “अधिकार अभिलेख’विषयक असून गाव नमुना नं 12 हा “पिकांची नोंदवही’ ठेवण्यासंदर्भात आहे. गाव नमुना नंबर 12 मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असतात.
पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी हे पीक पेरणी अहवालाच्या नोंदी नमूद करतात. मात्र अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदी अद्ययावत होत नाहीत. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने हे ऍप विकसित केले आहे. शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई पीक पाहणी या मोबाइल ऍपद्वारे फोटो अपलोड करत आहे. या मोबाइल ऍपमध्ये अक्षांश व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजणार आहे.
580 पिकांच्या नोंदी घेता येणार
ई-पीक पाहणी या मोबाइल ऍपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने नव्याने सुमारे 250 पिकांची नोंद सात-बारा उताऱ्यावर होऊ लागली आहे. या ऍपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहे.
कडधान्ये, तृणधान्ये, पॉलिहाऊसमधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या ऍपमध्ये 580 पिकांच्या नोंदी घेता येणार आहेत.