लाखणगाव, (वार्ताहर) – गेल्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढला असून शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असल्याने आंबेगाव तालुक्यातील विविध गावात पाणी उपलब्ध होण्यासाठी बोअरवेल घेण्याची धडपड सुरू आहे.
तालुक्याच्या पश्चिम भाग, पूर्व भागातील दोन्ही धामणी परिसरातील दुष्काळी गावे आणि सातगाव पठार भागातील अनेक गावांमध्ये शेतकरी शेतात, घरासमोर बोअरवेल घेताना दिसत आहेत. अनेकांच्या बोअरवेलला थोड्याफार प्रमाणात पाणी लागत आहेत. तर अनेकांची बोअरवेल मात्र कोरडे जात आहेत.
तालुक्यात मुख्यत्वे करून शेती हा व्यवसाय केला जात असुन शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, पशुपालन आदी व्यवसाय केले जातात. तालुक्यात घोड नदीपात्र तसेच डिंभे धरणाचा उजवा कालवा असल्याने यावरही अनेक शेतकर्यांची शेती पिके अवलंबून आहेत.
मात्र उन्हाळ्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर, पोखरी, कोंढ वळ, निगडाळे, तालुक्याच्या पूर्व भागातील वडगाव पीर, लोणी धामणी, मांदळवाडी, शिरदाळे, सातगाव पठार भागातील कुरवंडी, कारेगाव, पेठ आदी गावांना नेहमीच उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. यातील काही गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जातो.
या गावांना घोडनदीचे पाणी तसेच उजव्या कालव्याची पाणी मिळत नाही. त्यामुळे या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असते. तसेच अवसरी खुर्द, बुद्रुक, जारकरवाडी, मेंगडेवाडी या गावातील शेतकरी शेती पिके जगण्यासाठी धडपड करत असून शेतात घराच्या बाजूला पाणाड्याला बोलावून पाण्याची जागा शोधून त्या ठिकाणी बोअरवेल घेताना दिसून येत आहेत.
बोअरवेलला लागलेल्या थोड्याफार पाण्याच्या मदतीने पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच सातगाव पठार भागातील मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील शेतकरी शेतात बोअरवेल घेताना दिसत आहेत.
25 ते 30 हजार रुपये खर्च
बोअरवेल 80 रूपये फूट दराने घेतला जात असून 250/300 फुटापर्यंत बोअरवेल घेतले जात असून त्यासाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येत आहे. खर्च करू नाही पाणी लागले तर बरे नाही तर पाण्याअभावी बोअरवेल फेल झाला तर शेतकर्यांना भुर्दंड बसत आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढणे गरजेचे आहे.
शेतात किंवा बांधाच्या कडेला समतोल चर घेऊन पाणी जिरवा पाणी वाढवा या शासनाच्या धोरणाचे अवलंबन केल्यास शेतातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल असे, मत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे यांनी व्यक्त केले.