मोरगाव (वार्ताहर)- बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्नही बिकट निर्माण झालेले आहेत पाणी व चाऱ्या अभावी जनावरे दावणीला ओरडत असल्याने शासनाविरोधात तीव्र संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे परिसरात तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी बारामती तालुका शेतकरी संघटने कडून होत आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मोरगाव, तरडोली, जोगवडी, मुर्टी, मोढवे, लोणी भापकर,पळशी, मासाळवाडी, काऱ्हाटी, बाबुर्डी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जळगाव कप, कऱ्हावाजज या सर्वच पट्ट्यामध्ये पिण्याचे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झालेले आहे. पिण्याचे पाण्याच्या दुर्भिक्ष्याबरोबरच परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा बिकट निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा जोडधंदा दुग्धव्यवसाय असून शेतीबरोबरच हा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे जगायचं कसं, हा प्रश्न या पट्ट्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
जनावरांसाठी हिरवा चारा बागायती भागातून आणावा लागत आहे. मुबलक चारा व पाण्याअभावी अनेकांच्या दावणीची जनावरे आक्रोश करत असतानाचा दिसत आहेत. त्यामुळे या भागात चारा डेपो त्वरित सुरू करण्याचे मागणी मोरगावसह परिसरातील शेतकरी संघटनेकडून होत आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे नेते व पक्षाचे कार्यकर्ते राजकारणामध्ये सक्रिय असताना शेतकऱ्यांकडे एकही व्यक्ती ढुंकून पाहत नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमधून मोठा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परिसरात असलेल्या पशुगणनेनुसार जनावरांना पोटभर पिण्याचे पाणी मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाण्याअभावी माणसांप्रमाणे जनावरांचे मोठे हाल होत आहे. टॅंकरद्वारे येणारे पाणी तुट्पुंजे येत आहे. त्यामुळे याभागात तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
राज्यकर्त्यांची निष्क्रियता
बारामती तालुक्यातील मोरगावचा परिसर दुष्काळात होरपळत असताना राज्यकर्ते निवडणुकीच्या कामात मश्गूल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या कोणीच वाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता, या म्हणीप्रमाणे बारामती तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांची अवस्था झाली आहे.