खंडाळा (प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्याला धोम-बलकवडीच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. जिल्हाधिकार्यांनी तोंडी आदेश देखील दिले आहेत. मात्र अद्याप पाणी न सोडले नाही. शनिवार, दि. 20 रोजी पाणी नाही सोडले तर रविवार, दि. 2१ रोजीपासून खंडाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असून तरीही दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी व नागरिकांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांसोबतच शेती व जनावरांवर मोठे संकट उभे राहिले आहे. याबाबतचे निवेदन दिल्याने दि.15 रोजी जिल्हाधिकार्यांद्वारे संबंधित पाणी विभागाचे सर्व अधिकारी व शेतकरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन संबंधित अधिकार्यांना दोन दिवसांमध्ये खंडाळा तालुक्यात पाणी सोडण्याबाबतचे तोंडी आदेश दिले होते. परंतू, यावर पाणी न सोडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकर्यांनी धोम-बलकवडी धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केली असता पाणी आवर्तन करण्यासाठी दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. यावर संबंधित विभागांच्या अधिकार्यांकडे चौकशी केली असता याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने पाण्याचे आवर्तन सोडू शकत नाही असे सांगण्यात आले.
यानंतर गुरुवार दि. 18 रोजी शेतकर्यांनी तहसीलदार खंडाळा यांच्याकडे पाणी सोडण्याबाबत विचारणा केली. यावेळी तहसीलदार खंडाळा यांच्याद्वारे तात्काळ जलसंपदा विभाग सातारा कार्यालयातील संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यावेळी त्यांनाही दोन-तीन दिवसात पाणी सोडण्यात येईल असेच सांगण्यात आले.
तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन खंडाळा तहसीलदारांना परत एकदा देण्यात आले असून यामध्ये शनिवार, दि.21 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत धोम-बलकवडी कालव्याचे पाणी न सोडल्यास रविवार, दि. 2१ पासून खंडाळा तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपोषण करत तहसील कार्यालयास टाळा ठोकण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.