बांगला-भारत साटेलोटे
कलकत्ता, ता. 5 – भारत बांगला देशाला कापड पुरविणार आहे. कापडाच्या बदल्यात बांगला देश भारताला वृत्तपत्रीय कागद पुरविणार आहे. उभय देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या वाटाघाटीत हे ठरले.
वृत्तपत्रीय कागदाचा तुटवडा जगभर
नवी दिल्ली – भारत सरकारच्या माहिती व रेडिओ खात्यातर्फे असे जाहीर करण्यात आले की, वृत्तपत्रीय कागदाचा तुटवडा केवळ भारताला भासतो असे नव्हे तर त्याची ओरड जगभर आहे. आणखी काही वर्षे तरी हा तुटवडा भासणारच आहे. वृत्तपत्रीय कागदाचे जागतिक उत्पादन खूपच वाढले आहे, 1950 साली ते केवळ 90 लाख टन होते. आता ते 2 कोटी 31 लाख टनावर गेले आहे. पण कागदाचा खपही वाढला आहे. इतका की, हे एवढे उत्पादनही अपुरे वाटावे. आता ही मागणी 2 कोटी 35 लाख टन इतकी आहे.
आंतरराज्य गुन्हेगारी थांबवावी
नवी दिल्ली – उत्तर विभाग कौन्सिलची बैठक भरून तीत असे ठरले की, आंतरराज्य गुन्हेगारी प्रतिबंधक असे एक पोलीस अधिकाऱ्यांचे मंडळ नेमण्यात यावे. गृहखाते राज्यमंत्री के. सी. पंत यांनी अशी सूचना केली की, बंदुकीचे परवाने देताना काळजीपूर्वक विचार झाला पाहिजे. विशेषतः पंजाब राज्यात याची दक्षता अधिक घेतली पाहिजे.
संपर्क भाषा म्हणून इंग्रजीची जरुरी
पुणे – हल्ली जग जास्त जवळ येत चालले आहे. म्हणून एकमेकांना समजावून घेण्यासाठी सोयीच्या अशा संपर्क भाषेची जरूर आहे. इंग्रजी भाषेत ती क्षमता आहे. म्हणून इंग्रजी भाषा शिकणे अत्यंत जरूर आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे अर्थमंत्री मधुकरराव चौधरी यांनी काढले.
सिमला करार एक शहाणपणाची गोष्ट
नवी दिल्ली – सिमला करार भारताने केला ती गोष्ट अतिशय शहाणपणाची व योग्य अशीच झाली. उलट ती आगाऊ गुंतवणूक करून ठेवली आहे असे समजा, असे पाकिस्तानी प्रतिनिधीबरोबर वाटाघाटीसाठी गेलेले भारताचे खास दूत पी. एन. हक्सर यांनी म्हटले.