पेठ, (वार्ताहर) – सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बटाटा शेती केली जाते. दिवसेंदिवस बटाटा पिक भांडवली खर्चामुळे व बदलते हवामानामुळे आर्थिक तोटा येथील शेतकर्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे बटाटा पिकाबरोबर इतर पिकाकडे बटाटा उत्पादक शेतकर्यांनी वळावे रासायनिक खत कमी करून सेंद्रिय खताकडे वळावे, तरच शेतकर्यांना आर्थिक लाभ मिळेल, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी व्यक्त केले.
आदर्श गाव कुरवंडी (ता. आंबेगाव) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. गावडे बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मनोज कोल्हे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, विकास बारवे, दत्तात्रय तोत्रे, रुपेश भंगाळे, गंगाधर कोकिटकर, सुनील तोत्रे, जयराम तोत्रे, नंदराम वाघमारे व ग्रामविकास अधिकारी अशोक शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गावडे म्हणाले, दिवसेंदिवस बटाटा उत्पादक शेतकर्यांनी शेतकर्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी रासायनिक खते कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे त्यामुळे भांडवली खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल.
सततच्या बदलत्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करावे तरच शेतकर्याच्या घरात आर्थिक सुलभता निर्माण होईल यावेळी सहायक गटविकास अधिकारी मनोज कोल्हे, कृषी सहाय्यक सुशांत कराळे यांनी कृषी विभागाचे विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सूत्रसंचालन रवींद्र तोत्रे यांनी केले तर सुनील तोत्रे यांनी आभार मानले..