पेठ, (वार्ताहर) – सातगाव पठार (ता.आंबेगाव) भागातील बहुतांश शेती जिराईत स्वरूपाचा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या वळईचे काम पूर्ण झाले असून शेतातील नांगरणी अंतिम टप्प्यात चालू आहे. साधारणपणे चार ते पाच हजार कडब्याची वळई दोन ते तीन दिवसांमध्ये चार कारागीर रचून पूर्ण करतात. यामध्ये वळई रचणारा मुख्य कारागीर त्याच्या हाताखाली कडव्याच्या पेंढ्या फेकणारे दोन मजूर आणि रचून झालेली वळई फळीने चोपणारा, असे साधारणपणे चार जण मजूर लागतात.
साधारणपणे एका वळईला पाच ते सहा हजार मजुरी लागते त्यामुळे अनेक शेतकरी एकमेकांना वळई रचण्याच्या कामामध्ये एकमेकांना सावडीने मदत करतात त्यामुळे मंजुरीच्या पैशाची बचत होते. पठार भागामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या घरासमोर पाळीव जनावरांच्या गोठ्या जवळील मोकळ्या जागेत आकर्षक पद्धतीच्या वळई रचलेल्या दिसून येतात.
ज्वारी पिकाची काढणी करून झाल्यावर कडबा पावसाने भिजू नये व पावसाळ्यात चारा म्हणून जनावरांना उपयोगी पडावा याकरता वळई रचली जाते. वळईर रचण्याआधी उंदीर,घुशी यांच्यापासून कडव्याच्या पेंड्यांची नासधूस होऊ नये याकरता शेतकरी जमिनीपासून साधारणपणे एक ते दोन फुटाचे फाउंडेशन तयार करून घेतो आणि त्यानंतर त्यावर वळई रचण्याचे काम केले जाते.
जुन्या काळी घरासमोरील वळई जेवढी मोठी असेल तेवढा शेतकरी जमीन जुमल्याने तसेच पाळीव जनावरे यांनी मोठा समजला जात होता. त्यामुळे सोयरीक आपसूकच जुळली जायची. काळाच्या ओघांमध्ये वळई संस्कृती लोप पावत चालली असून अनेक शेतकरी चाऱ्याची कुट्टी करून साठवून ठेवण्याकडे कल वाढत चालला आहे. – दिलीप म्हातारबा पवळे, बैलगाडा मालक