मलठण, {तुकाराम कत्तुरे}- दिवसेंदिवस शहरी लोकांसोबत ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा विविध आजारांनी ग्रासले आहेत. जीवनमान जगत असताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रोजच्या आहारात विषमुक्त भाजीपाल्याची कमतरता आहे. यासाठी विषमुक्त आणि सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली परसबाग शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.
शेतकरी अनावश्यक रसायनाच्या फवारण्या करतो. त्या भाज्या शेतातून २- ३ दिवसांत आहारात येतात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ग्रामीण भागातील शेतकरी बांधव ज्यांच्याकडे मुबलक शेती उपलब्ध असुनही भाजीपाला आणण्यासाठी आठवडे बाजारात जात आहे. त्यामुळे होणारा खर्चही वेगळाच आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून परसाबागेतील विषमुक्त भाजीपाला हा शेतकऱ्यांना वरदान आहे.
घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग आहे. रोजच्या आहारात आवश्यक भाजीपाला पिकवणे हा हेतू आहे. यावेळी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रकारची भाजी कशी घेता येईल, याचा विचार करून जागेचे नियोजन करावे. हे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाला पिकांची निवड करावी लागते.
• छोटी परसबाग
१.५ ते ५ गुंठे या जागेत केलेली परसबाग. यामध्ये हंगामी भाजीपाला, फळभाज्या आदी लागवड केली जाऊ शकतो.
• गच्चीवरील परसबाग
पॉलिथीन पेपर अंथरून त्यवर माती टाकून अथवा ग्रोबॅग वापरून परसबाग तयार करता येवू शकेल.
कशी करावी लागवड
भाजीपाल्याची लागवड करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोली पुरेशी होते. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन फुटवा येतो व आपल्याला भाजी मिळते.
फळभाजीची लागवड सायंकाळी करा
फळभाजीची लागवडरोपांची लागवड साधारणत: सायंकाळी करावी, म्हणजे रात्रभरात ती मूळ धरतात. शक्य झाल्यास त्यांना सुरुवातीला दोन-तीन दिवस अर्ध ऊन-सावलीत ठेवावीत म्हणजे तग धरतात. वांगी, मिरची आदी फळवर्गीय झाडे यांना फळं येऊन गेलीत की ते महिनाभराचा विसावा घेतात. पुन्हा फळे येतात. झाड जुनं झालं की त्यास खोडापासून चार इंचांवर छाटावं त्यास पुन्हा बहर येतो.
वेलवर्गीय भाज्या वाफा पद्धतीत करा
विविध वेलवर्गीय भाज्या लागवड या वाफा पद्धतीत छान बहरतात. वेलांच्या वाढीचं, त्याला लागणाऱ्या फळांचं एक नसर्गिक तंत्र आहे. वेल हा मातीच्या पृष्ठभागात ६ ते १० इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. पण वाफा हा लांब असावा. कारण वेलाच्या मुळ्या जितक्या लांब पसरतील तितक्याच तो वेल बहरतो. वाल आणि कारलं, डांगर, देवडांगर, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी यांचीही लागवड करता येते.
फुलझाडे लागवड
परसबागेत फुलझाडे वृक्षवर्गीय लावायची झाल्यास पारिजातक, सोनचाफा, झुडूपवर्गीय लावायची झाल्यास जास्वंद, गुलाब, मोगरा, शेवंती, अबोली, वेलवर्गीय जाई, जुई, चमेली तर कंदवर्गीय निशिगंध, झिनिया, लिली ही फुलझाडे लावता येतील.
घरगुती औषधांसाठी अडुळसा, वेखंड, गवती चहा, तुळस या औषधी वनस्पतींचा समावेश करता येईल. फुलझाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची व मोकळ्या हवेची आवश्यकता असते. पुरेसा सूर्यप्रकाश नसेल तर झाडांची चांगली वाढ होत नाही
खत व पाणी व्यवस्थापन
जमीन नांगरतेवेळी शेणखत मिसळावे. ठरावीक अंतर निश्चित केल्यानंतर बियाणे लागवडीसाठी खो-याच्या सहाय्याने खड्डे तयार करावेत. एका खड्डय़ात अर्धा ते एक घमेले कुजलेले शेणखत सर्व खताची सर्वच पिकांसाठी वेळी मातीत चांगल्या प्रकारे मिसळेल अशा पद्धतीने द्यावी.
झाड फुलो-यावर आल्यानंतर फळे येण्यास सुरुवात होते, पावसाळी हंगामात भाजीपाला पिकांना पाण्याची गरज भासत नाही. परंतु आठ दिवसांमध्ये जास्त दिवस पाऊस पडला नाही तर पाण्याची सोय करावी. अतिउपसा झाल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी.
किड व रोग व्यवस्थापन
परसबागेतील किड व्यावस्थापन करण्यासाठी घरीच कडुलिंब , कोवळा काँग्रेस (गाजर गवत) यांचा गोमुत्रासोबत अर्क, तसेच दशपर्णी अर्क, लसूण +मिरची+ अद्रक याचा अर्क तयार करून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल त्यावेळी ताकाची फवारणी करावी. या उपाययोजना केल्या तर आपल्याला नक्कीच विषमुक्त भाजीपाल्याचा आहारात सामावेश करून आपल आयुष्य निरोगी बनवता येईल.
महत्व
• आवडीची व रोज ताजी भाजी मिळेल.
• आरोग्य चांगले राहील
• शरीरास भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे मिळतील
• परसातील भाजीच्या देवाणघेवाणमुळे संबंध सुधारतील.
• पैशाची बचत होईल.
• पैशाची गरज भागवून उरलेल्या भाजी विक्रीमुळे उत्पन्न वाढेल.
• परसबागेचा कार्यक्रम महिलांना गटांमध्ये चांगल्याप्रकारे करता येईल.
• परसबागेच्या उत्पन्नातून सामुहिक लघुउद्योग सुरू करता येऊ शकतो.
अन्य पर्यावरवण, आरोग्यमय फायदे
1. सांडपाण्याची विल्हेवाट
2. उत्पन्नात वाढ
3. वेळेचा सदुपयोग
4. स्वच्छ वातावरण निर्मिती
5. निरोगी आरोग्य
6. कुपोषणाला व रक्त कमतरतेला आळा
7. परसबागेमुळे घराची शोभा तर वाढते
अलीकडच्या काळात शेतकरी सुद्धा हातात पिशवी घेऊन आठवडे बाजारात मंडई आणण्यासाठी जात आहेत. परंतु दिवसेंदिवस शेती पिकांमध्ये कीडनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणीमुळे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान एक गुंठ्यात परसबाग तयार करून विषमुक्त भाजीपाला स्वतःसाठी पिकवला पाहिजे.
– महेश रामभाऊ रुपनवर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक. आत्मा. दौंड.