पेठ, (वार्ताहर)- मंचर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये शिवसेनेचे शिवाजी दादा आढळराव पाटील (शिंदे गट) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) मध्ये नुकताच प्रवेश केला. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि खेडचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटीलसह प्रमुख नेते उपस्थित होते.
याप्रसंगी खेडचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी कलमोडीच्या पाण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याने सातगाव पठार भागातील शेतकर्यांच्या पाण्यासंदर्भातील आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. आतापर्यंत खेडच्या आमदारांचा कलमोडीचे पाणी सातगाव पठार भागामध्ये जाण्याला विरोध आहे, असे सांगितले जायचे.
पण धरण माझ्या खेड तालुक्यात आहे त्यामुळे त्याचा लाभ माझ्या खेड तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील पारगाव तर्फे खेड, वरुडे, वाफगाव, जवळके कनेरसर आधी गावांसह शेतकर्यांना होणार असेल तर सातगाव पठार भागात कलमोडीचे पाणी सोडण्याबाबत आमची कोणती हरकत नाही, अशा आशयाचे ते वक्तव्य होते. त्यामुळे सातगाव पठार भागातील शेतकर्यांमध्ये एक आनंदाची वातावरण तयार झालेले आहे.
त्यामुळे आज पेठ (ता. आंबेगाव) येथे वाकेश्वर मंदिरासमोर सातगाव पठार भागातील शेतकरी तसेच प्रमुख कार्यकर्ते यांनी एकत्रित येत एकमेकांना लाडू भरून आपला आनंद व्यक्त केला तसेच खेडच्या आमदार दिलीप अण्णा मोहिते यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर गेली 30 ते 35 वर्षे कळमोडीच्या पाणी सातगाव पठार भागामध्ये येण्याबाबत ज्या अडचणी आणि कारणे सांगितले, त्या सर्व अडीअडचणी आणि कारणे भविष्यात दूर होऊन लवकरच सातगाव पठार भागाला कळमोडीचे पाणी मिळेल अशी आशा शेतकरी आणि कार्यकर्ते यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, शरद सहकारी बँकेचे संचालक संतोष धुमाळ, रस्ते सुरक्षा समिती सदस्य अशोक बाजारे, भाजप जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांची प्रमुख भाषणे झाली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे उपसभापती सचिन पानसरे, बाजार समितीचे माजी संचालक सागर थोरात, गणेश थोरात, पेठचे सरपंच रामशेठ तोडकर, भाऊ सावंत, सुनील तोत्रे, सोपान नवले प्रल्हाद कुदळे, ज्ञानेश्वर एरंडे, रामभाऊ घेवडे, आदी उपस्थित होते.
अन्यथा नेत्यांना फिरू देणार नाही
याप्रसंगी जयसिंग एरंडे यांनी खेड तालुक्यासह आंबेगाव तालुक्यातील प्रमुख नेते एकत्रित आल्यामुळे कळमोडी प्रकल्पाला चालना भेटून सातगाव पठार भागातील पाण्यामुळे अर्थकारण बदलून टाकणारा कळमोडी प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. तसे झाले नाही तर नेतेमंडळींना सातगाव पठार भागातील जनता पठारावर फिरून देणार नाही असे सांगितले.