नवी दिल्ली -महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल्स) अंदाज खोटे ठरल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधक कडवी झुंज देतील, हा अंदाज बांधण्यात त्या चाचण्या कमी पडल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर विविध मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र आणि हरियाणात भाजप घवघवीत यश संपादन करेल. त्यामुळे विरोधक चारीमुंड्या चीत होतील, असे भाकीत बहुतांश चाचण्यांनी केले. मात्र, ते भाकीत वस्तुस्थितीपासून बरीच फारकत घेणारे ठरले आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि इतर लहान पक्षांच्या महायुतीने सत्ता राखली आहे.
मात्र, महायुती चाचण्यांच्या अंदाजाप्रमाणे कामगिरी करू शकलेली नाही. काही चाचण्यांनी तर महायुतीला 288 पैकी 200 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. एका चाचणीने तर भाजप एकट्याच्या बळावर बहुमताच्या आकड्याजवळ पोहचेल, असे म्हटले होते.
हरियाणातही मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपच्या पदरात जागांचे मोठे दान टाकले होते. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यातील 70 ते 75 जागा भाजपला मिळू शकतील, असे काही चाचण्यांनी म्हटले होते.