मोरगिरी – कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करून पश्चिमेकडे समुद्राला जाणारे पाणी मुंबईकडे पिण्यासाठी वळवले तर काय हरकत आहे. यात कसले ही राजकारण नसून त्याला कोणीही राजकीय वळण देऊ नये. कोयना प्रकल्प आणि पर्यटनाबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबतचा आराखडा लवकरच तयार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोयनेचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोयनानगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पाहणी करता कोयनानगर येथे आले होते. याबाबत कोयनानगर येथील चेंबरीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना ना. पाटील बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांची उपस्थिती होती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोपळी येथील कोयना विद्युत ग्रह टप्पा क्रमांक 4 ची व कोयना धरण प्रकल्पाची पाहणी केली.
ना. बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, राज्यात आघाडीचे शासन सत्तेत आल्यावर राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांची पाहणी करून हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय झाले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकत्रित येता येत नसल्याने अनेक प्रकल्पांना भेटी देता आल्या नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा प्रकल्पांना भेटी देऊन ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले की, 1964 सालापासून कोयना जलविद्युत प्रकल्पाची यंत्रसामुग्री जुनी आहे. त्यात आमूलाग्र बदल करून सध्याची सुमारे दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता पुढे अधिक वाढवता येईल का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली.