पुराच्या पाण्यातही राजकारणाची ढवळाढवळ
पुरग्रस्तांसाठी मदतीला सरसावले शेकडो हातही
आम्ही सुरक्षित आहोत. आमच्या डोक्यावर आभाळ फाटलयं. भुईवर बघलं तिकड पाणीच पाणीय. आमच्या अवतीभवतीचं कोण जगणारं, कोण मरणारं, सारं पाण्याच्या पोटात दडलयं. सभोवताली पाणीच पाणी. पण पिण्याचं पाणी नाही. लेकराबाळांसाठीही दुधाचा थेंब नाही. भाकर मिळाली, नाय मिळाली तरी आम्ही धडपड करतोय. जीवात जीव असेपर्यंत जगण्याची लढाई करणार. तरीही आम्ही एकटेही नाही. या लढाईत आमच्यासोबत आहेत युवक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, प्रशासनातील तळमळीचे अधिकारीही.
खंत वाटते ती राजकारणातील नेतेमंडळींनी पाठ फिरवली त्याची. स्थानिक नेतेमंडळींनी जमेल तशी मदतीची भूमिका घेतली. पण राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांनी आपली मस्ती आम्हाला दाखवली. आमचे मुख्यमंत्री पाचव्या दिवशी आले नि हवाई पाहणी करुन गेले. पालकमंत्र्यांना त्याचदिवशी आठवण झाली. ते आले आणि राजकारणात तेल ओतून गेले. आमच्या खासदारांना तर त्यांच्याच मतदारसंघातील दोन तालुक्यात महापुराने हाहाकार माजवलाय याची खबर खूपच उशिरा दिली असावी. त्यामुळे त्यांना येण्यासाठी शुक्रवार उजाडला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या हवाई पाहणीच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींनी हजेरी लावत सरकारवर तोफ डागली.
या नेतेमंडळींच्या येण्या न येण्यानं पुरस्थितीत काही बदल नसता झाला. पण लोकांच्या प्रश्नासाठी झगडत असल्याची अँक्टिंग करणाऱ्यांना आपत्तीप्रसंगी लोक कसे जगतात, याची थोडीफार कल्पना तरी आली असती. बरं झालं तुम्ही आला नाहीत. आम्हाला मदत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना तुमची खातरदारी करावी लागली असती. शिवाय तुम्ही मदतीची फक्त आश्वासनेच दिली असती. या तुमच्या मदतीपेक्षाही सर्वसामान्य माणसांनी केलेली मदत आम्हाला मोलाची वाटली. अनेक गावांतून साध्या साध्या माणसांनी आमच्यासाठी भाकरी गोळा केल्या.
कपडे मिळवले. औषधे जमवली. आमच्या गरजा ओळखून त्यांनी त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे खारीचा वाटा उचलला. आमच्यापर्यंत अन्नासह पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर गरजेच्या वस्तू पोहचवल्या. आमची जगण्याची उमेद वाढवली. राजकारण्यांची उदासीनता आणि सामान्यांची संवेदनापूर्ण सकारात्मकता आम्ही अनुभवली.
राजकारण जरुर केलं पाहिजे, पण ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी. पालकमंत्र्यांना सातारा जिल्ह्यात यायला वेळ मिळाला आणि त्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली हे एक आश्चर्यच घडले. तरीसुद्धा माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांनी पुराच्या पाण्यातही आपली पोळी भाजली.
खासदारांनी आश्वासने दिली, हेही कमी नाही. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेतेमंडळी पुरात उतरुन लोकांना मदत करुन जगण्यासाठी बळ देत होते. सातारा जिलल्ह्यातील पाटणचा अपवाद वगळता इतरांनी पूर फार गांभीर्याने घेतला नाही. कारणे काहीही असोत साताऱ्यातील राजकारणाची ही हतबलता संकटापेक्षा अडचणीची आहे.
राजकारणी लोकांपेक्षा सर्वसामान्य लोकांनी दाखवलेले माणुसकीचे दर्शन आशादायी आहे. मदतीचे शेकडो हात आज पुरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे अजूनही सारा अंधार नाही. प्रकाशाचे हे कवडसेही साऱ्या दुनियेला जगण्याची उमेद देत राहतील.