शहिदांना आदरांजली : श्रद्धांजलीनिमित्त शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प तडीस लावू : राष्ट्रवादी कॉंग्रेस
‘प्रकल्प बंद होईपर्यंत लढा कायम’ : भाजप
पवनानगर – पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. मावळ तालुक्यातील या घटनेला रविवारी (दि. 9) नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पवन मावळात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसह विविध संस्था, संघटनांकडून आदरांजली वाहण्यात आली. प्रकल्प बंद होईपर्यंत लढा कायम ठेवणार असल्याची भूमिका माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी घेतली असली तरी राष्ट्रवादीकडून आमदार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि कोणतेही राजकारण न करता प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले. मात्र भाजपकडून श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादीवर चिखलफेक करण्यात आली, तर राष्ट्रवादीकडून प्रकल्पाच्या प्रश्नाबाबत भाजपकडे बोट दाखविण्यात आले.
मावळ गोळीबारात शहीद झालेल्या तीन शेतकऱ्यांना मावळवासीय, सर्वपक्षीयांकडून रविवारी (दि. 9) आदरांजली वाहण्यात आली. येळसे येथील “सोशल डिस्टन्सिंग’द्वारे श्रद्धांजली सभेत पवना बंदिस्त जलवाहिनी कायमची रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार, असे मत माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मत व्यक्त केले आहे.
9 ऑगस्ट 2011 रोजी पवना बंदिस्त जलवाहिन्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनात झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेला 9 वर्षे पूर्ण होत. यावेळी येळसे येथील स्मारकावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना भेगडे म्हणाले की, मागील पाच वर्षांत राज्यात भाजप, शिवसेनेची सत्ता होती. या काळात जे शेतकरी मृत्युमुखी पडले, त्यांच्या वारसांना पिपंरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्यात आली. तसेच या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे मागे घेण्यात आले. येळसे येथे मृत शेतकऱ्यांचे स्मारक उभे केले आहे. आता जलवाहिनी रद्द करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन देत ती कायमची रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
यावेळी भाजपाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, भाजपाचे कार्याध्यक्ष किरण राक्षे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पवना जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, महागाव गणाचे अध्यक्ष नारायण बोडके, किसन खैरे, विश्वनाथ जाधव, अंकुश पडवळ, संदीप भुतडा आदी उपस्थित होते
दरम्यान, दरवर्षी ही श्रद्धांजली सभा मोठी होत असते; परंतु करोनाचा वाढता संसर्ग पाहता तसेच या ठिकाणी जमावबंदीचा आदेश असल्यामुळे काही मोजक्याच नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थीत ही सभा झाली. सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते स्मारकापर्यंत ज्योत आणण्यात आली. त्यानंतर बरोबर 12 वाजून 40 मिनिटांनी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिवसेनेच्या श्रद्धांजलीची चर्चा…
गेल्या वर्षांपर्यंत शिवसेना पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात होती. आज मात्र चित्र वेगळे दिसले; प्रत्येक श्रद्धांजली सभेसाठी शिवसेना भाजपासोबत सहभागी होती; परंतु सध्या शिवसेना ही राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्तेत सहभागी असल्याने त्यांनी या श्रद्धांजली सभेसाठी भाजपसोबत न येता वेगळी श्रद्धांजली वाहिली. सकाळी 11 वाजता आमदार सुनील शेळके यांनी देखील या भागातील शेतकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारीसोबत येऊन स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहिली. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांसह श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनी संदर्भातील शेतकऱ्यांना तसेच पक्षातील पदाधिकारी यांनी विश्वासात घेऊन याचे राजकारण न करता प्रकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तसेच गेल्या पाच वर्षांत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार होते; परंतु जलवाहिनीचा प्रश्न व्यवस्थित हाताळता न आल्याने जलवाहिनी रद्द होऊ शकली नाही. या वेळी संत तुकारामचे कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, माजी उपसभापती शरद हुलावळे, ज्येष्ठ नेते माऊली ठाकर, अमित कुंभार, बाळासाहेब मसुरकर, संजय मोहोळ, अनिल तुपे, बबन वर्वे, विजय ठाकर, अजित चौधरी यांच्यासह कार्येकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पुणे-मुंबई द्रुतगतीवर विधीवत पूजा
पवना जलवाहिनीला नऊ वर्षे पूर्ण होत आहे. त्याअनुषंगाने व दरवर्षीप्रमाणे जेथे शेतकऱ्यांनी बलिदान दिले. त्याबलिदान स्थळी जाऊन त्यांचे विधिवत पूजा व श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, सचिन वाळके, रोहित गुरव, भावेश खराडे, मोरेश्वर देवकर, चिराग खराडे उपस्थित होते.