कोलकाता – अल्-कायदाशी संबंधित सहा दहशतवाद्यांना शनिवारी पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या त्या कारवाईवरून बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या राजकीय फैरी सुरू झाल्या आहेत.
दहशतवाद्यांच्या अटकेवरून विरोधकांनी तृणमूल कॉंग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यासंदर्भात बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी म्हणाले, दहशतवाद्यांच्या अटकेमुळे राज्य पोलीस दलाचे गुप्तचरविषयक अपयश समोर आले. दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यात राज्य प्रशासन सक्षम असल्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बांगलादेशच्या सीमेलगत असणाऱ्या भागातील कारवाईमुळे संपूर्ण बंगाल राज्याचे नाव खराब झाले, असेही त्यांनी म्हटले. तर, तृणमूल सरकारने लांगूलचालनाचे आणि मतपेढीचे राजकारण सोडून दहशतवादी जाळे उद्धवस्त करण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
विरोधकांनी केलेल्या टीकेला तृणमूलचे खासदार सौगात रॉय यांनी प्रत्युत्तर दिले. दहशतवादी सीमा ओलांडून आले. त्यामुळे सीमाभागांमध्ये तैनात असणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलांनी अधिक सतर्कता बाळगायला हवी. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत मुद्द्यावर विरोधक राजकारण करत आहेत, असा पलटवारही त्यांनी केला.