-डॉ. ललित कांत
भारतात जेव्हा कोविड-19 वरील लसीला मंजुरी दिली जाईल तेव्हा जगातील अन्य देशांमध्ये झालेल्या चाचण्या व आपल्याकडे झालेल्या चाचण्यांची आकडेवारी एकत्र करून ताडून पाहिली जाईल. माहितीचे विश्लेषण व परिणाम या आधारावरच लसीला अनुमती दिली जाईल.
ब्रिटनमध्ये एका आरोग्य स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम दिसून आले होते आणि त्यानंतर चाचणी तिथेच रोखण्यात आली. ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियातर्फे (डीसीजीआय) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला नोटीस पाठविण्यात आली होती आणि अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या चाचण्यांबद्दल माहिती का दिली गेली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका पीएलसी यांच्या वतीने या लसीची चाचणी केली जात आहे. ब्रिटनमध्ये या लसीच्या चाचण्यांना आता पुन्हा परवानगी देण्यात आली आहे.
लसीच्या चाचण्यांमध्ये अनेक लोकांना सहभागी करून घेतले जाते. जेव्हा चाचणीदरम्यान लोकांना लस दिली जाते, तेव्हा त्यातील अनेकांना आधीपासूनच आजार असतो. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा जेव्हा अभ्यास केला जातो, तेव्हा प्रत्येक व्यक्तीची आधी वैद्यकीय तपासणी केली जाते. एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच एखादी व्याधी नाही ना, हे पाहिले जाते; परंतु जेव्हा तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या केल्या जातात, तेव्हा त्यासाठी सामान्य जनतेतून लोकांची निवड केली जाते. त्यांची आधी वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याने आधीपासून त्यांना काही आजार आहे का, हे पाहिले गेलेले नसते.
एखाद्या व्यक्तीला आधीपासून काही आजार असेल आणि त्याला लस दिल्यानंतर त्रास झाला, तर तो लसीमुळेच झाला असे म्हटले जाते. त्या आजाराचे कारण काय हे जाणून घेण्यासाठी पुन्हा तपासणी करावी लागते. त्यासाठी डेटा अँड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड (डीएसएमबी) नावाची तपासणी समिती असते. सर्व माहिती आणि आकडेवारी या समितीकडे दिली जाते. ही स्वतंत्र संस्था असते आणि लस तयार करणाऱ्या कंपनीशी या समितीचा काहीही संबंध नसतो. ज्या व्यक्तींना लसीच्या चाचणीनंतर त्रास होत आहे, त्यांना तो लसीमुळे होत आहे की, अन्य काही कारणामुळे होत आहे, याची तपासणी ही संस्था करते. याच तपासणीवर पुढील कार्यवाही अवलंबून असते.
उदाहरणच घ्यायचे झाल्यास, पाणी पीत असलेल्या व्यक्तीचा सापाने चावा घेतला आणि तिचा मृत्यू झाला, तर ज्यांना सापाने चावा घेतला हे माहीत नाही ते म्हणणार की, पाणी प्यायल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला. पाण्यात काहीतरी मिसळलेले होते; परंतु असे दावे निराधार असतात. ऑक्सफर्डच्या चाचण्यासंदर्भातील बातम्यांमध्ये असे म्हटले होते की, चाचण्या सुरू असताना संबंधित स्वयंसेवकाला ट्रान्सवर्स मायलायटिस असल्याचे निष्पन्न झाले. या लसीच्या चाचणीचे पहिले दोन टप्पे अत्यंत यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या लसीमुळे कुणाला काही त्रास झाला असेल, असे वाटत नाही.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लसीचा किती डोस दिला पाहिजे, हे पाहिले जाते आणि
इम्युनोजेनेसिटीही (रोगप्रतिकारशक्ती) तपासली जाते. त्याचबरोबर संबंधित लस इम्युन रिस्पॉन्स म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तयार करीत आहे की नाही, हेही पाहिले जाते. जर ही शक्ती तयार होत असेल तर शरीराची प्रतिक्रिया कशी आहे, हेही पाहिले जाते. रोगप्रतिकारशक्तीची प्रतिक्रिया विषाणूला खरोखर मारण्यास सक्षम आहे की नाही, याची शहानिशा केली जाते. न्यूट्रलायझिंग अँटिबॉडीज तयार होत आहेत की नाहीत, याचाही शोध घेतला जातो. हा प्रतिसाद दोन प्रकारचा असतो.
एक, सेल्युलर रिस्पॉन्स आणि दुसरा ह्यूमरल रिस्पॉन्स. सेल्यूलर रिस्पॉन्समध्ये टी-सेल्स आदी पाहिल्या जातात. या पेशी दीर्घकाळपर्यंत रोगप्रतिकारशक्ती राखून ठेवण्याचे काम करतात. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरक्षितता आणि इम्युनोजेनेसिटी पाहिली जाते. ज्या लसींना परवानगी दिली जाते, त्यांच्यात सुरक्षितता आणि इम्युनोजेनेसिटीशी संबंधित कोणत्याही अडचणी नसतात; परंतु तिसऱ्या टप्प्यात या लसीचा प्रभाव दीर्घ कालावधीसाठी तपासला जातो. ज्या अँटिबॉडीज शरीरात तयार होतात, त्या किती काळपर्यंत व्यक्तीला संरक्षण देतात, हे पाहिले जाते. सुरक्षिततेशी संबंधित मुद्देही तिसऱ्या टप्प्यातच अधिक स्पष्ट होतात.
सध्या करोनाच्या सर्व लसी विकसित होण्याच्या टप्प्यात आहेत. जगात केवळ तीन लसींना परवानगी मिळालेली आहे; परंतु ही परवानगीही आणीबाणीच्या वेळी वापरासाठी आहेत. यात रशियाची स्पुटनिक लस आणि चीनच्या दोन लसींचा समावेश आहे. या लसींना तिसऱ्या टप्प्यातील मर्यादित चाचण्यांनंतर अनुमती देण्यात आली; परंतु दीर्घकाळपर्यंत खात्रीने सुरक्षित ठरेल अशी लस अद्याप यायची आहे. सुरक्षिततेसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लसीचे प्रभाव बारकाईने तपासणे. जोपर्यंत सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत, तोपर्यंत कोणतीही लस सामान्य नागरिकांना दिली जाऊ शकत नाही. अलीकडील काळात केवळ आणीबाणीच्या वेळी वापरासाठी अनुमती मिळू शकते. अनेक औषधांनाही परवानगी देण्यात आली आहे.
भारतात सीरम इन्स्टिट्यूटव्यतिरिक्त इतर ज्या तीन-चार कंपन्यांनी लस तयार केली आहे, त्यांचे संशोधन प्राथमिक टप्प्यात आहे. त्यात जायडस तसेच भारत बायोटेक्सच्या लसीचा समावेश आहे. त्यांना दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची परवानगी मिळाली आहे; परंतु कोणत्याही लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पाच सर्वाधिक महत्त्वाचा असतो. किती काळापर्यंत रोगप्रतिकारशक्ती टिकते आणि किती काळपर्यंत सुरक्षितता मिळते, हे याच टप्प्यात तपासले जाते. काही लसींचे दुष्परिणामही होऊ शकतात. यापैकी काही दुष्परिणाम लगेच दिसून येतात, तर काही दुष्परिणाम दिसून येण्यास सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळेच कोणतीही लस दिल्यापासून सहा ते आठ महिन्यांनंतर तितकीच प्रभावी आणि सुरक्षित आहे की नाही, हे पाहणे आवश्यक ठरते. प्रत्येक लसीचे तंत्रज्ञान आणि तयार करण्याची पद्धती वेगवेगळी आहे.
लसीची चाचणी घेताना दोन गोष्टींची विशेषत्वाने काळजी घेतली जाते. पहिली सुरक्षितता आणि दुसरी इम्युनोजेनेसिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तयार होण्याची आणि टिकण्याची प्रक्रिया. कोणत्याही ठिकाणच्या, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला लस दिली गेली, तर तिच्यावर कोणतेही दुष्परिणाम होता कामा नयेत, याची काळजी घेणे आवश्यक असते. ज्या कारणासाठी लस दिली जात आहे, त्या आजारास कारणीभूत असणाऱ्या विषाणूचा हल्ला ती लस परतवून लावू शकते की नाही, हे प्रामुख्याने पाहिले जाते. चाचण्या थांबविल्या म्हणजे ती लस घातक आहे किंवा कुचकामी आहे, असे म्हणता येत नाही.