बारामती -गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरती घेण्यात आली नाही. या कालावधीत दोन सरकारे सत्तेवर आली. घोषणांचा पाऊस झाल्यानंतर विद्यार्थी सुखावले होते. राज्यकर्त्यांचा हा घोषणापाऊस ठरला आहे. पोलीस भरती प्रक्रिया रखडल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भावी आयुष्यात अंधार दाटून येत आहे.
महाराष्ट्रात 2018 नंतर पोलीस भरती घेण्यात आली नाही. पोलीस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री व इतर मंत्र्यांकडून घोषणांची मांदियाळी झाली. परंतु अद्यापपर्यंत पोलीस भरतीची तारीख जाहिर झाली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेतले, परंतु त्याचीही पुढे प्रक्रिया राबविली नाही.
पोलीस भरतीची तयारी करणारे बहुसंख्य उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, मुले ही कष्टकरी, शेतकरी, मजुरांची आहेत. ही मुले शहराच्या ठिकाणी राहून अभ्यास करतात, क्लास लावतात, पुस्तके व खानावळ आदींचा होणारा खर्च त्यांना पेलवत नाही. ही भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे, विद्यार्थी नैराशात गेलेले आहेत, पालकसुद्धा खचून गेले आहेत. महाराष्ट्रात करोनाच्या काळात इतर परीक्षा घेतल्या जातात. मात्र, पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात नाही.
आंदोलनाशिवाय सरकारला जाग येणार नाही – रुपनवर
बारामतीचे पोलीस भरतीचे मार्गदर्शक उमेश रुपनवर म्हणाले की, पहिल्या टप्प्यामध्ये दि. 21 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणाचा निषेध केला जाईल. 25 मार्च रोजी महाराष्ट्रात पोलीस भरती न झालेल्या घटनेला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रतिकात्मक स्वरुपात केक कापून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला जाईल. त्याचे ट्विट उचज महाराष्ट्रापासून सर्व मंत्र्यांना केले जाईल.
तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, डम्बलर, गुगल प्लस यांसारख्या सर्व सोशल मीडिया नेटवर्कवर हस्टॅग मोहीम महाराष्ट्रवर राबविली जाईल. एवढे करूनही सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली नाही तर दुसरा टप्पा हा दि. 28 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीदरम्यान राबविला जाईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालयांना पोलीस भरती करण्याबाबतची निवेदने दिली जातील. सरकारने प्रतिसाद दिला नाही तर शेवटी पोलीस विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरुपात आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिली.
पाच ते सहा वर्षांची मेहनत वाया जाणार
स्पर्धा परीक्षेसाठी बारामतीसह जिल्ह्यातील सुमारे दहा ते वीस हजार विद्यार्थी तयारी करतात. त्यात हजारो विद्यार्थी हे पदवीनंतर परीक्षेसाठी बारामती, पुणे शहरात येतात. त्यांचा शिक्षण आणि राहण्याचा खर्च महिन्याकाठी सात ते दहा हजारांच्या घरात आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी पाच ते सहा वर्षे परीक्षा देत आहेत. त्यात काही विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा पार होत आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांचे यात वर्ष आणि वयोमर्यादा वाया जाणार असल्याने खाकी वर्दीचे स्वप्न भंगणार काय, याची चिंता त्यांना सतावू लागली आहे.