शिरूर -शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सरदार पेठ येथे असलेला विद्युत पोल दहा ते बारा वर्षांपासून वाहनाने धडक दिल्याने झुकला आहे. परंतु महावितरणचे याकडे दुर्लक्ष झाले असून पोलमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महावितरण अपघात झाल्यानंतर जागे होणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
शहरात सरदार पेठ येथे रहदारीच्या रस्त्यावर भरचौकात हा पोल अनेक वर्षांपासून वाहनाने धडक दिल्याने वाकलेला आहे. पोलवरून तारा व अनेक घरगुती कनेक्शन देण्यात आलेले आहेत. हा वाकलेला खांब आणि कनेक्शनच्या वायरी धोकादायक झाल्या आहेत. या बागेतून मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेज व नागरिक शहरात येत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे स्थानिक नेते, नगरसेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते लक्ष देत नाहीत.
अखेर बारा वर्षांनंतर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष केशव लोखंडे यांनी ही समस्या सोशल मीडियाद्वारे नागरिकांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे महावितरण कंपनी आता तरी जागे होणार काय, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उमटत आहे.